“बाळासाहेब अनेक वर्ष “मातोश्री’वर राहिले, त्यामुळे ते जिवंत स्मारक म्हणून जनतेसाठी खुले करावे” – भाजप आमदाराची मागणी

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शुक्रवारी 11 वा स्मृतिदिन होता. या निमित्ताने राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक दादरच्या शिवाजी पार्कमध्ये बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी दाखल झाले होते. त्याचबरोबर अनेक राजकीय नेते मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले. परंतू या सर्वांत बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्ताने भाजप आमदार राम कदम यांनी वेगळी मागणी केली आहे.
अनेक वर्ष बाळासाहेब “मातोश्री’ या निवासस्थानी राहिले. त्यामुळे त्या बंगल्याला जिवंत स्मारक म्हणून जनतेसाठी खुले करावे, अशी मागणी कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे ट्वीट करत केली आहे.
कदम यांनी ट्वीटमध्ये म्हटले, आज स्वर्गीय बाळासाहेबांचा स्मृतिदिन आहे. ज्या मातोश्री बंगल्यात स्वर्गीय बाळासाहेब अनेक वर्ष राहिले. तेच खरे जिवंत स्मारक जनतेसाठी का खुले नाही ? अनेक धाडसी निर्णय ज्या बंगल्यात त्यांनी घेतले. दिवस रात्र बाळासाहेबांचा ज्या स्थळी वावर होता. खऱ्या अर्थाने तीच वास्तू देशभरातल्या जनतेसाठी प्रेरक आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे निधन 17 नोव्हेंबर 2012 रोजी झाले होते. त्यामुळे त्यांच्या शुक्रवारी स्मृतिस्थळी त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे, नातू आदित्य ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर फुलांची आरास करण्यात आली होती. तसेच, आदल्या दिवशी घडलेल्या प्रकरणामुळे खबरदारी म्हणून स्मृतीस्थळ परिसरात पोलिसांकडून कडेकोट पोलीस बंदबस्त ठेवण्यात आला होता.






