Bailey Bridge : दित्वा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागातली संपर्क व्यवस्था पुन्हा उभारण्यासाठी भारताने शनिवारी कोलंबोला १० बेली ब्रिज (Bailey Bridge) पाठवले. आयएनएस घरियालवरून विशाखापट्टणमहून कोलंबोला १० बेली ब्रिज रवाना करण्यात आले, असे परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या अलिकडच्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान भारताने ४५० दशलक्ष अमेरिकन डॉलरचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. त्या पॅकेज अंतर्गत हे बेली ब्रिज श्रीलंकेला रवाना केले जात आहेत. श्रीलंकेच्या मदतीसाठी भारताने ऑपरेशन सागर बंधू राबवले होते. त्यानुसार ही मदत दिली जात आहे. गेल्या आठवड्यात, भारताच्या मदतीचा भाग म्हणून, बी-४९२ कॅंडी-रागला रोडवरील १२० फूट लांबीच्या बेली ब्रिजचे उद्घाटन श्रीलंकेतील भारताचे उपउच्चायुक्त सत्यंजल पांडे आणि खासदार मंजुला सुरवीरा अराची यांनी संयुक्तपणे केले. या पुलामुळे एक महत्त्वाचा रस्ता पुन्हा सुरू झाला. प्रवाशांच्या हालचाली, आवश्यक वस्तूंचा पुरवठा आणि स्थानिक आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू होण्यासाठी या पुलामुळे एक महत्त्वाचा वाहतूक कॉरिडॉर पुन्हा सुरू झाला. पाठवण्यात आलेले १० बेली ब्रिज भारतात बांधून ते श्रीलंकेत नेऊन उभे करण्यात येत आहेत. आणखी काही बेली ब्रिज उभारण्याचे काम या आठवड्यात सुरू केले जाणार आहे.