नवी दिल्ली – दिल्लीत झालेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेऊन त्यांना तेथील परिस्थितीची माहिती दिली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. बैजल यांनी आपण मोदींशी चर्चा केली एवढीच माहिती माध्यमांना दिली. पण या चर्चेत त्यांनी पंतप्रधानांना नेमका काय तपशील दिला याची माहिती त्यांनी उघड केली नाही.
दंगलग्रस्त दिल्लीतील स्थिती आता बहुतांशी शांत आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीच्या काहीं भागात झालेल्या दंगलीत किमान 42 जणांचे बळी गेले असून दोनशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बेैजल यांनी पहिल्यांदाच पंतप्रधानांची भेट घेतली. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती हाताळण्याचे काम आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर सोपवण्यात आले आहे.