आयुध कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांचा संप मागे

नवी दिल्ली: आयुध कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला. एआयडीएफ, आयएनडीडब्ल्यूएफ, बीपीएमएस आणि सीडीआरए कर्मचारी संघटनांची संरक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या संरक्षण सामग्री उत्पादन खात्याच्या सचिवांशी 14 ऑगस्टपासून चर्चा सुरु होती. चर्चेच्या चौथ्या फेरीत संप मागे घेण्याबात निर्णय झाला.
संरक्षण उत्पादन सचिवांनी कर्मचारी संघटनांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच आयुध निर्माण कारखान्यांचे निगमीकरण (कॉर्पोरेटायजेशन) झाल्यास होणाऱ्या लाभांबाबतही चर्चा केली. सविस्तर चर्चेनंतर कर्मचारी संघटनांचे म्हणणे ऐकून नवीकरणाचा निर्णय घेण्यापूर्वी उच्चस्तरीय समिती कर्मचारी संघटनांशी चर्चा करतील, असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर सर्व कर्मचारी सोमवार, 26 ऑगस्टपासून कामावर रुजू होतील, असे सांगण्यात आले.
संपूर्ण भारतात एकूण ४१ कारखाने असून त्यातील सर्वात जास्त म्हणजे १० कारखाने महाराष्ट्रात आहेत. यामध्ये जवळपास ८२ हजार स्थायी तर ४० हजार अस्थायी कर्मचारी काम करत आहेत. या सर्व कामगारांची उपजीविका यावर अवलंबून असून जर या कंपन्यांचे खाजगीकरण झाले तर हि कुटुंबे रस्त्यावर येणार आहेत.





