Gulabrao Patil : ‘माझ्या गावात पाय ठेवून तर दाखवा, मंत्री गुलाबराव पाटलांचा बच्चू कडूंना खणखणीत आव्हान

Bachchu Kadu vs Gulabrao Patil clash : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नवा वाद पेटला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. या धमकीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
मात्र, गुलाबराव पाटील यांनी या इशाऱ्याला जशास तसं प्रत्युत्तर देत बच्चू कडूंना थेट आव्हान दिलं आहे. “पाळधी गावात एकदा पाय ठेवून तर दाखवा! मोर्चा काढण्याची भाषा करताय, मग आधी माझ्या गावात येऊन बघा,” असं खणखणीत आव्हान पाटील यांनी दिलं आहे.
“मोर्चा काढणं हे आमचं काम आहे. बच्चू कडू जर खरंच पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार असतील, तर त्यांनी एकदा पाळधी गावात येऊन दाखवावं,” असं सणसणीत प्रत्युत्तर देत पाटील यांनी कडूंना चांगलंच सुनावलं. पाळधी हे गुलाबराव पाटील यांचं गाव असून, त्यांनी या आव्हानातून बच्चू कडूंना आपल्या गावात येण्याचं धाडस करण्याचा टोमणा मारला आहे.
या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांभोवती सुरू असलेला वाद आता अधिकच तापण्याची शक्यता आहे. बच्चू कडू यांच्या मोर्चाच्या इशाऱ्याला पाटील यांनी दिलेल्या या खरमरीत प्रत्युत्तराने राजकीय चर्चांना नवं वळण मिळालं आहे. आता बच्चू कडू या आव्हानाला कसं प्रत्युत्तर देतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.




