B.R.Gavai : न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेत गुणवत्तेशी तडजोड नाही; सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी केले स्पष्ट

मुंबई : सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्त्या पारदर्शक करण्याचे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर.गवई यांनी केले आहे. बॉम्बे बार असोसिएशनच्या एका कार्यक्रमात बोलताना न्यायमूर्ती गवई यांनी भर दिला की आम्ही सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश केंद्रित आहे ही मानसिकता नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत.
बॉम्बे बार असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात एक सत्कार समारंभ आयोजित केला होता, ज्यामध्ये बी.आर.गवई यांनीही भाग घेतला होता. सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश केंद्रित नाही. न्यायिक संस्थेचे हित लक्षात घेऊन, आम्ही माजी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या काळापासून न्यायाधीशांच्या नियुक्त्या पारदर्शी करण्याचा प्रयत्न करत आहोत असे गवई यांनी यावेळी नमूद केले.
ते म्हणाले की न्यायालयाने ५४ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर ३६ जणांची नियुक्ती सुचवली आहे. न्यायाधीशांची नियुक्ती प्रक्रिया आता मोठ्या प्रमाणात पारदर्शक असेल, ज्यामध्ये समाजातील सर्व घटकांना संधी दिली जाईल. न्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया गेल्या ३ दिवसांपासून सुरू आहे. ५४ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या, त्यापैकी ३६ नावे सुचवण्यात आली आहेत.
सर्व घटकांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित केले जाईल, परंतु कोणत्याही किंमतीत गुणवत्तेशी तडजोड केली जाणार नाही. न्यायालयात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या खटल्यांबद्दल बोलताना सरन्यायाधीश म्हणाले की, प्रलंबित खटले ही एक मोठी समस्या आहे. याचे एक मोठे कारण म्हणजे न्यायालयात रिक्त पदे आहेत. आम्ही त्यावरही काम करण्याचा प्रयत्न करत आहोत.





