Ayushman Bharat – महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत आता ५ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च असलेल्या दुर्मिळ आजार आणि अवयव प्रत्यारोपणासाठी रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे जमा होणाऱ्या २० टक्के राखीव निधीतून हा खर्च देण्यासाठी कार्यपद्धती राज्य शासनाने जाहीर केली आहे. यापूर्वी जन आरोग्य योजनेत उपचारांची मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत होती. मात्र, अवयव प्रत्यारोपण किंवा कृत्रिम प्रत्यारोपणासारख्या शस्त्रक्रियांसाठी यापेक्षा जास्त खर्च येतो. अशा ९ प्रकारच्या दुर्मिळ उपचारांसाठी आता राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या राखीव निधीतून आर्थिक मदत दिली जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव चंद्रकांत विभूते यांनी जारी केला आहे. यासाठीचे पात्रता निकष जाहीर करण्यात आले आहे, त्यानुसार रुग्ण महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यांतर्गत सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक, आधार कार्ड, रेशन कार्ड, रुग्णालयाचे नोंदणी प्रमाणपत्र, बँक तपशील आणि विशेष तज्ज्ञांचे शिफारस पत्र आवश्यक आहे. यानंतर आलेल्या अर्जांना मंजुरीसाठी समितीची रचना करण्यात आली आहे. छाननी समिती ही अर्जांची प्राथमिक तपासणी करेल. वैद्यकीय व राखीव निधी मंजुरी समिती ही दर शुक्रवारी या समितीची बैठक होईल. राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती अर्जांना तांत्रिक मंजुरी देऊन निधी निश्चित करेल. विशेष उपचार सहाय्यता व सक्षमीकरण समिती ही या सर्व प्रक्रियेवर देखरेख ठेवून कामाचा आढावा घेईल. रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाइकांना प्रत्यक्ष पैसे न देता, उपचारांचा मंजूर खर्च थेट रुग्णालयाच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने जमा केला जाईल. यासाठी रुग्णालयांना रुग्णाच्या वतीने विहित नमुन्यात प्रस्ताव आणि खर्चाचे अंदाजपत्रक सादर करावे लागेल. राज्य आरोग्य हमी सोसायटी लवकरच यासाठी ऑनलाइन संगणक प्रणाली विकसित करणार आहे. तोपर्यंत हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. उपचार पूर्ण झाल्यानंतर रुग्णालयांना डिस्चार्ज कार्ड आणि सर्व वैद्यकीय देयके सादर करणे बंधनकारक असणार आहे.