प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीची मागणी
पिंपरी – “करोना’सोबत लढत असलेल्या योद्धांना सुरक्षित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शरीर निर्जंतुकीकरणासाठी “सॅनिटायझेशन टनेल’ची अभिनव कल्पना पुढे आली. परंतु या टनेलमधून केली जाणारी केमिकल फवारणी आरोग्यासाठी घातक ठरु शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर “सॅनिटायझेशन टनेल’मधून आयुर्वेदिक मिश्रण द्रव्यांची फवारणी केली जावी, अशी मागणी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने केली आहे.
“करोना’सोबत लढणाऱ्या कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी “सॅनिटायझेशन टनेल’ लावण्यात आले आहेत. परंतु टनेलद्वारे होणाऱ्या केमिकल फवारणीमुळे आरोग्याबाबतच्या अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने देखील फवारणीसाठी वापरण्यात येणारे सोडियम हायड्रोक्लोराईट हे द्रव्य शरीरासाठी घातक असल्याचे स्पष्ट केले आहे.
तर उद्देश सफल होईल
समितीचे अध्यक्ष पाटील म्हणाले, या टनेलच्या रसायन फवारणीमुळे डोळे लाल होणे, चुरचुरणे, त्वचेला खाज सुटणे, त्वचा कोरडी होणे, श्वास घेण्यास अडचण निर्माण होणे अशा शारीरिक व्याधी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी उभ्या केलेल्या व लाखो रुपयांची गुंतवणूक केलेल्या टनेलचे आता करायचे काय? असा प्रश्न उभा राहिला आहे. परंतु टनेल ही मुख्य अडचण नसून सॅनिटायझेशन फवारणी करिता वापरण्यात येणारे केमिकल सोल्युशन हेच अडथळा ठरले आहे. हे द्रव्य जर आयुर्वेदिक द्रव्यामध्ये बदलले तर “सॅनिटायझेशन टनेल’चा मुख्य उद्देश नक्कीच सफल होईल.
ठरू शकते उपयोगी
भारत सरकारच्या आयुष विभागानेसुद्धा आयुर्वेदिक उपायांना प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे माणसांवर केमिकल फवारणी न करता आयुर्वेदिक मिश्रणाची फवारणी करावी. कडुलिंबाच्या पानात अँटीऑक्सिडेंट, बॅक्टेरिया विरोधी अँटीसेफ्टीक गुण असतात. तसेच सी व्हिटॅमिनने भरपूर असलेले लिंबू, आवळा यांच्या रसाचाही काही प्रमाणात उपयोग करता येईल. आरोग्यदायी तुळसी रसाचाही वापर करता येईल. या आयुर्वेदिक फवारणी द्रव्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत, असे उपाय समितीच्या वतीने सुचविले आहे.
4000 वर्षांपासून भारतीय आयुर्वेदात महर्षी आचार्य श्री चरक, निघंटू ,पाराशर यांनीही कडुलिंब पाने, तुळशी पाने, व लिंबू यांचे महत्व विशद केले आहे. आपल्याकडे आयुर्वेदाचा मोठा वारसा आहे, त्याचा उपयोग टनेलमध्ये फवारणीसाठी केल्यास दुष्परिणाम बिल्कुल न होता “करोना’सोबत लढणाऱ्यांना मदतच होईल.
– विजय पाटील, अध्यक्ष, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती