चाचणीसाठी संशोधक डॉ. राजेशकुमार गंझू यांचा केंद्राकडे मागणीचा प्रस्ताव
सांगवी – करोना रूग्णांचे “व्हायरल इन्फेक्शन’ कमी करून प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी देशातील पहिले आयुर्वेदिक गांझूवीर औषधाची चाचणी करण्याबाबत पिंपळे गुरव येथील संशोधक डॉ. राजेशकुमार गंझू यांचा केंद्र सरकारकडे मागणीचा प्रस्ताव पाठवला आहे. आयुष मंत्रालयाकडूनही त्यांना सकारात्मक उत्तर आल्याचे डॉ. गंझू यांनी दै. “प्रभात’शी बोलताना स्पष्ट केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या संशोधक डॉ. राजेशकुमार गंझु यांनी 14 वर्षांच्या संशोधनानंतर रेबीज, डेंग्यू, चिकुनगुनिया, जापनीज ताप, चिकन पॉक्स, हेपेटाईटीस, गालफुगी यांसारख्या अँटी व्हायरल आजारावर देशातील पहिले आयुर्वेदिक औषध शोधले असल्याचा दावा केला आहे. याशिवाय या शोधासाठी भारत सरकार पेटेंट कार्यालयाकडून त्यांना गांझूविर या औषध निर्मितीचे पेटेंट मिळाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
रेबीज, डेंग्यू, चिकुनगुनिया, ताप या आजारांवर या औषधाची मात्रा चांगली लागू पडत असल्याने रुग्णास त्याचा फायदा होत असल्याचा दावा डॉ. गंझु यांनी केला आहे. सध्या जग कोविड 19 कोरोना या महामारीशी लढा देत आहे. गांझूवीर आयुर्वेदीक औषध हे व्हायरल आजारावर रूग्णांचे व्हायरल इन्फेक्शन कमी करून मानवी प्रतिकारशक्ती वाढवून प्रभावी ठरल्याचे चाचण्यांद्वारे सिद्ध झाल्याने करोना संसर्गग्रस्तांवर या औषधाचा उपयोग करावा. यामुळे करोना रूग्णांची प्रतिकारशक्ती वाढून व्हायरल ईन्फेक्शन कमी होवून यात ते लाभदायक ठरेल. यासाठी केंद्र सरकार आयुष विभागाकडे या चाचणीबाबत डॉ. राजेशकुमार गंझू यांनी प्रस्ताव पाठवला आहे. याबाबत आयुष मंत्रालयाकडूनही त्यांना सकारात्मक उत्तर आल्याचे त्यांनी सांगितले.
खुंटी (झारखंड) येथील मूळ स्थानिक असलेल्या डॉ. राजेशकुमार गंझू यांनी सालपर्णीया औषधी वनस्पतीवर गेली चौदा वर्ष संशोधन केले आहे. गेल्या काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड उपनगरातील पिंपळे गुरव येथे ते वास्तव्यास आहेत. डेंगूसारख्या आजारावर या औषधाची चाचणी पिंपरी-चिंचवडमधील लोकमान्य रिसर्च सेंटर ईम्प्रेक्स हेल्थकेअर येथून पूर्ण करण्यात आलेली आहे. तर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेंटल हेल्थ आणि न्युरो सायन्सेस बंगळूर, हाफकिन इन्स्टिट्यूट मुंबई, वरूण हर्बल हैद्राबाद, इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जयपूर, आयुषराज एंटरप्रायझेस जयपूर यांच्याकडे या औषधाच्या चाचण्या झालेल्या आहेत. सध्या करोना महामारीत रूग्णांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गांझूविर लाभदायक ठरेल, यासाठी भारत सरकार आयुष मंत्रालय व महाराष्ट्र सरकारकडे कोविड रूग्णांवर या औषधाची चाचणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.