Raj Thackeray : अभिनेत्यांना पुरस्कार, पण आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले…

पुणे : आज पुण्यात तिसरे विश्व मराठी संमेलन पार पडले. या संमेलन समारोपाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्यासह आदी दिग्गज उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेच्या संवर्धनावर भर दिल्याचं पाहायला मिळाले. तसेच या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी अभिनेत्यांना पुरस्कार मिळतो, पण आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार असतो, असं म्हणत जोरदार फटकेबाजी केली.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, तुमच्या मनात आलं असेल की मी या ठिकाणी कसा? हा शासनाचा कार्यक्रम आहे. पण मला उदय सामंत यांनी गळ घातली. त्यामुळे मला तुमचं सर्वांचं दर्शन झालं. त्यासाठी मी उदय सामंत यांचे आभार मानतो. पुढे म्हणाले, माझे मित्र अभिनेता रितेश देशमुख यांना माझ्या हस्ते पुरस्कार देण्यात आला आहे. हे सर्व भाग्यवान माणसं, मी पुरस्कार दिला म्हणून नाही. पण यांना पुरस्कार मिळतात आणि आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार असतो. तिरस्कार घेऊन आम्हाला पुढे वाटचाल करावी लागते, अशी फटकेबाजी राज ठाकरे यांनी केली.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, दुसऱ्या देशातील माणसं हे आपल्या देशाशी आणि भाषेशी खूप प्रामाणिक असतात. मग त्यांचा अभिमान आपल्यालाही वाटायला लागतो की ते त्यांच्या भाषेशी किती प्रामाणिक आहेत. आपल्या देशात सुद्धा स्वत:च्या भाषेशी प्रामाणिक आहेत. आपल्या देशातील दुसरे राज्य जर त्यांच्या भाषेबाबत एवढा अभिमान बाळगून असतील तर आपण दुसऱ्या भाषेत का बोलतो? आता कार्यक्रमात राज्यगीत लागलं होतं. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ मग भारतातील दुसऱ्या राज्यात कोणत्या राज्याचं राज्यगीत आहे, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.





