Aurangzeb tomb : छत्रपती संभाजीनगरात ‘NIA’च्या पथकाची एन्ट्री; संशयिताच्या हालचालीवर बारीक लक्ष

Chhatrapati Sambhajinagar | Aurangzeb tomb : नागपूर दंगलीच्या काही तास आधी, दोन वेगवेगळ्या ठिकाणी डझनभर लोकांना जमवणारी व्यक्ती म्हणून 17 मार्चच्या नागपूर हिंसाचाराच्या संदर्भात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये फहीम शमीम खानची ओळख पटली आहे. त्याला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली असून 21 मार्चपर्यंत तो पोलिस कोठडीत राहणार आहे.
गणेशपेठ पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या दुसऱ्या एफआयआरनुसार, खानने सुमारे 500 लोकांचा जमाव भडकावल्याचा आरोप आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात चकमकी, तोडफोड आणि स्थानिक पोलिसांवर हल्ले झाले.
एफआयआरनुसार, बजरंग दल आणि विहिंपच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी करत निषेध केला आणि औरंगजेबचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. दोन गटांमध्ये तणाव वाढला, ज्यामुळे दगडफेक, जाळपोळ आणि हल्ले झाले.
यामध्ये पोलिसांसह काही नागरीक जखमी झाले आहेत. दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला असला तरी या घटनेनंतर राज्यात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) दिल्लीचे एक पथक छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाले आहे. परभणी, जालना, नांदेड या ठिकाणीदेखील पथक गेले असून तेथील संशयित हालचालींवर लक्ष आहे.
एटीएस अधिकार्यांची मदत घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली, ज्या जिल्ह्यांना दंगलीची पार्श्वभूमी आहे त्या जिल्ह्यातल्या हालचालीवर बारीक नजर ठेवण्यात येणार आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळच्या लेण्या त्याचबरोबर घृष्णेश्वर मंदिर आणि लगतचा असलेला दौलताबाद किल्ला याठिकाणी पर्यटकांची संख्या ही मागील काही दिवसांपासून याच प्रकरणामुळे कमी झाल्याचं चित्र आहे.
दंगलीतील जखमींची संख्या:
पोलिसांच्या माहितीनुसार, 33 ते 34 पोलीस जखमी झाले, यात 3 पोलीस उपायुक्तांचा समावेश आहे. एका उपायुक्तावर कुऱ्हाडीने हल्ला झाला, ज्यामुळे त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. 4 ते 5 नागरिक जखमी झाले, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्याला ICU मध्ये ठेवण्यात आले आहे.
नुकसानाची माहिती:
45 ते 48 वाहनांची तोडफोड झाली, यात दोन क्रेन आणि अनेक दुचाकींचा समावेश आहे. काही वाहनांना आग लावण्यात आली. हिंसाचारात पेट्रोल बॉम्ब, तलवारी, कुऱ्हाडी आणि दगडांचा वापर झाला. घटनास्थळी अर्धा ट्रक दगडं सापडली, जे पूर्वनियोजित हल्ल्याचे संकेत देतात. महाल परिसरात मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले, ज्यात काही घरे आणि दुकानांना लक्ष्य केले गेले.





