ATM Withdrawals : वारंवार एटीएमचा वापर करता? RBI ने घेतला मोठा निर्णय, ‘या’ तारखेपासून द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क

ATM withdrawals to get costlier | तुम्ही जर वारंवार एटीएम कार्डचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता एटीएममधून वारंवार रोख रक्कम काढणे महागणार आहे. 1 मे पासून एटीएममधून रोख रोख रक्कम काढताना अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे.
रिपोर्टनुसार, 1 मे पासून भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे (RBI) इंटरचेंज फी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहक त्यांच्या बँकेव्यतिरिक्त इतर बँकेच्या माध्यमातून मर्यादेपेक्षा अधिक वेळा पैसे काढत असल्यास हे शुल्क द्यावे लागणार आहे. एटीएम इंटरचेंज शुल्क हे एक बँक दुसऱ्या बँकेला एटीएम सेवा पुरवण्यासाठी देते.
सध्या इतर बँकांच्या एटीएममधून मोफत व्यवहारांची मर्यादा मेट्रो शहरांमध्ये 5 आणि इतर शहरांमध्ये 3 आहे. निश्चित केलेल्या मर्यादेनंतर प्रत्येक व्यवहारावर अतिरिक्त शुल्क लागेल.
1 मे पासून ग्राहकांना मोफत मर्यादेपेक्षा जास्त प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी अतिरिक्त 2 रुपये द्यावे लागतील. बिगर-आर्थिक व्यवहारांसाठी, जसे की बॅलन्स तपासण्यासाठी शुल्कात 1 रुपयांची वाढ होईल. यामुळे एटीएममधून रोख रक्कम काढण्यासाठी प्रति व्यवहार 19 रुपये खर्च येईल, जो यापूर्वी 17 रुपये होता. तसेच, खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी आता प्रति व्यवहार 7 रुपये खर्च येईल.
ऑपरेशनल खर्च वाढल्याने व्यवसायांवर परिणाम होत असल्याचे काही एटीएम ऑपरेटर्सने म्हटले होते. त्यामुळे आरबीआयकडून यासंदर्भाती निर्णय घेण्यात आला. ही वाढ देशभर लागू होणार असून, याचा सर्वाधिक परिणाम लहान बँकांच्या ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ऑनलाइन वॉलेट आणि यूपीआयमुळे एटीएममधून रोख रक्कम काढण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आर्थिक वर्ष 2014 मध्ये भारतातील डिजिटल पेमेंटचे प्रमाण 952 लाख कोटी रुपये होते. तर आर्थिक वर्ष 2023 पर्यंत हा आकडा 3,658 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. यावरून कॅशलेस व्यवहारांचे वाढते प्रमाण दिसून येते.



