पुणे जिल्हा | आपदग्रस्त कुटुंबीयांना लाखाची मदत

पारगाव शिंगवे, (वार्ताहर) – निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे शेततळ्यात शुक्रवारी (दि. 24) बुडून मृत्यू पावलेल्या चारही मुलांच्या कुटुंबीयांना भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सोमवारी (दि. 27) प्रत्येकी एक लाख रुपये मदत करण्यात आली.
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव दत्तात्रयनगर येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांच्या हस्ते या चारही मुलाच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्यात आली.
यावेळी कारखान्याचे संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, रामहरी पोंदे, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे, चीफ अकौटंट राजेश वाकचौरे, ऊस विकास अधिकारी विकास टेंगले, निरगुडसरचे ग्रामस्थ मिलिंद वळसे, कैलास सुडके व निरगुडसर ग्रामस्थ उपस्थित होते
शुक्रवारी (दि. 24) दुपारी तीन वाजता श्रद्धा काळू नवले (वय 12)सायली काळू नवले (वय 10), दीपक दत्ता मधे (वय 7), राधिका नितीन केदारी (वय 13), थोरात मळा निरगुडसर ही शाळकरी मुले शेततळ्यात बुडून मरण पावली होती, त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून म्हणून भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आली.
शेततळ्यामध्ये मृत पावलेल्या मुलांच्या कुटुंबांची दुःखाची तीव्रता खूप जास्त आहे. हे दुःख वाटून घेणे शक्य नाही; परंतु भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माध्यमातून आर्थिक स्वरूपात प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपये देऊन त्यांचे दुःख थोडेसे हलके करण्याचा छोटासा प्रयत्न कारखान्याच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या दुःखद घटनेत देखील काही व्यक्ती वैयक्तिक स्वार्थासाठी यामध्ये राजकारण करत आहेत हे चुकीचे आहे, असे बाळासाहेब बेंडे यांनी सांगितले.
निरगुडसर येथे शेततळ्यात बुडून मृत्यू पावलेल्या चारही मुलांच्या कुटुंबीयांना भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने प्रत्येकी एक एक लाख रुपये मदत देण्यात आली.याशिवाय या चारही कुटुंबांना शासकीय मदत मिळण्यासाठी आवश्यक ती मदत व पाठपुरावा केला जाईल. – बाळासाहेब बेंडे, अध्यक्ष, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना


