Asia Cup 2025 : इंग्लंडला त्यांच्याच भूमीत पाणी पाजणाऱ्या ‘या’ 5 दिग्गज खेळाडूंना टीम इंडियातून डच्चू

मुंबई: आशिया कप 2025 साठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 15 खेळाडूंचा भारतीय संघ जाहीर केला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात नुकत्याच इंग्लंड दौऱ्यात टेस्ट मालिकेत 750 रन करणाऱ्या शुभमन गिलचे पुनरागमन झाले आहे. विशेष म्हणजे, बीसीसीआयने गिलला उपकर्णधारपदाची जबाबदारी देऊन त्याला बढती दिली आहे. याशिवाय, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहदेखील युएईत होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघासोबत असेल.
नुकत्याच संपलेल्या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाने 5 टेस्ट मालिकेत 2-2 अशी ऐतिहासिक बरोबरी साधली. मात्र, या मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाच खेळाडूंना आशिया कपच्या संघात स्थान मिळालेले नाही. निवड समितीच्या या निर्णयाने यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर आणि मोहम्मद सिराज यांना धक्का बसला आहे.
यशस्वी जयस्वाल
इंग्लंड दौऱ्यात यशस्वी जयस्वालने 5 टेस्ट सामन्यांत 41.10 च्या सरासरीने 411 रन केले, यात 2 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश होता. आशिया कपसाठी गिलच्या जागी जयस्वालला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, निवड समितीने शुभमन गिलवर विश्वास दाखवत जयस्वालला टी-20 संघातून वगळले.
ऋषभ पंत
ऋषभ पंतने इंग्लंड दौऱ्यात 4 टेस्ट सामन्यांत 479 रन केले, ज्यात 2 शतके आणि 3 अर्धशतके होती. मात्र, चौथ्या टेस्टदरम्यान पायाला झालेल्या दुखापतीमुळे तो पाचव्या टेस्टमध्ये खेळू शकला नाही. पायाच्या फ्रॅक्चरमुळे पंतला 6 आठवडे मैदानापासून दूर राहावे लागणार आहे. शिवाय, अलीकडच्या काळात टी-20 क्रिकेटमध्ये त्याला संघर्ष करावा लागल्याने आशिया कपच्या संघात त्याची निवड झालेली नाही.
केएल राहुल
केएल राहुलने इंग्लंड दौऱ्यात 53.20 च्या सरासरीने 532 रन केले, ज्यात 2 शतके आणि 2 अर्धशतके होती. तरीही, निवड समितीने त्याचा टी-20 संघासाठी विचार केला नाही. राहुल हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 हजार रन करणाऱ्या भारताच्या 4 खेळाडूंपैकी एक आहे. त्याने शेवटची टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच 10 नोव्हेंबर 2022 रोजी इंग्लंडविरुद्ध ऍडलेड येथे खेळली होती.
वॉशिंग्टन सुंदर
वॉशिंग्टन सुंदरने इंग्लंड दौऱ्यात 4 टेस्ट सामन्यांत 47.33 च्या सरासरीने 284 रन केले, ज्यात 1 शतक आणि 1 अर्धशतकाचा समावेश आहे. चौथ्या टेस्टमध्ये भारत अडचणीत असताना सुंदरच्या शतकाने सामना अनिर्णित राखला, तर शेवटच्या टेस्टच्या शेवटच्या डावात त्याच्या आक्रमक खेळीने भारताला मोठा स्कोअर उभारण्यास मदत केली. याशिवाय, त्याने मालिकेत 7 विकेट्सही घेतल्या. तरीही, आशिया कपच्या संघात त्याला स्थान मिळाले नाही.
मोहम्मद सिराज
मोहम्मद सिराज इंग्लंड मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने 5 टेस्ट सामन्यांत 23 विकेट्स घेतल्या. मात्र, निवड समितीने आशिया कपसाठी त्याच्यावर विश्वास दाखवला नाही.
आशिया कप 2025 साठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षीत राणा, रिंकू सिंग.





