Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात मोठा निर्णय घेत राज्य सरकारने शिवनिका संस्थानला पाणी देण्याचा आदेश रद्द केला आहे. या निर्णयाची माहिती राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. तसेच नियमबाह्य पद्धतीने पाणी देण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अशोक खरात यांच्या शिवनिका संस्थानसाठी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी मंजूर करण्यात आले होते. हा निर्णय प्रशासनाच्या नियमांना धरून नसल्याची बाब समोर आल्यानंतर सरकारने तो आदेश रद्द करण्याचा निर्णय घेतला. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, अशा प्रकारे खासगी संस्थेला पाणी देणे नियमबाह्य आहे. या संबंधित फाईलवर कुणाच्या सह्या आहेत याची सखोल चौकशी केली जाईल. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर चौकशीअंती कठोर कारवाई करण्यात येईल. सरकारकडून आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.