Ashadhi Wari: मार्केटयार्ड वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज! यंदा पूरस्थितीमुळे २ ऐवजी ३ दिवस राहणार मुक्काम
Ashadhi Wari: आळंदी-देहूतील पूरसदृश स्थितीमुळे वारकऱ्यांना पुण्यातच थांबण्याच्या सूचना; मंगळवारपासूनच दिंड्या मार्केटयार्डात दाखल.

Ashadhi Wari – पावसामुळे वारकऱ्यांना पुण्यातच थांबण्याची सूचना केली असल्याने मंगळवारपासून (दि.७) वारकरी मार्केटयार्डात दाखल होत आहेत. येते तीन दिवस वारकर्यांचा गुळ-भुसार, फळे, भाजीपाला, फुले, केळी विभागात मुक्काम असणार आहे. वारकर्यांच्या स्वागतासाठी मार्केटयार्ड सज्ज झाले आहे. आळंदी-देहूतील पुरसदृश्य स्थितीमुळे अनेक वारकरी मार्केट यार्डात दाखल झाले आहेत. दरवर्षी दोन दिवस वारकरी मार्केटयार्डात मुक्कामी असतात. यंदा ते तीन दिवस असतील. व्यापार्यांनी वारकर्यांच्या मुक्कामाची, चहा, नाश्ता, भोजनाची व्यवस्था केली आहे.
आज दरवर्षीप्रमाणे ठरलेल्या वारकर्यांच्या दिंड्या मार्केटयार्डात दाखल होत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीने पिण्याचे पाणी, स्वच्छता कामगार, औषध फवारणी व कचरा निर्मूलन आदींचे नियोजन केले आहे. तसेच मोबाईल शौचालयाचीही व्यवस्था केली आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी मार्केटयार्ड पोलीस विभागातर्फे विशेष सुरक्षा व्यवस्था असेल. वारकरी दाखल झाल्यानंतर आपापले व्यवसाय बंद ठेवून व्यापारी तीन दिवस वारकरी सेवेत असतील. तसेच भजन, किर्तनाचा लाभही घेणार आहेत.
वारकरी सेवेचे नियोजन पूर्ण
बाजार समितीतर्फे वारकर्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा केली आहे. स्वच्छतेसाठी कामगार वाढविले आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी फवारणी होणार आहे. सर्व विभाग प्रमुखांना वारकर्यांना सोयीसुविधा पुरविण्याच्या सूचना केल्या आहेत. वारकरी मुक्कामाला असेपर्यंत सचिव, संपूर्ण संचालक मंडळ नियोजनावर लक्ष ठेवून असतील, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप यांनी दिली.
वारकरी सेवा भाग्यच
मार्केट यार्डातील गुळ भूसार विभागामध्ये ३३ ठिकाणी दिंड्यांचा मुक्काम असणार आहे. तीन दिवस १६ हजार २०० वारकर्यांचा मुक्काम राहणार आहे. त्यांच्या मुक्कामाची, चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था केली आहे. वारकर्यांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत. वारकर्यांची सेवा हे आम्ही आमचे भाग्य समजतो, अशा भावना दि पुना मर्चंटस चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी व्यक्त केल्या.





