प्रचार संपताच पीएम मोदी जाणार कन्याकुमारीला

नवी दिल्ली – सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातले मतदान १ जून रोजी आहे. त्याचा प्रचार ३० मे रोजी सायंकाळी संपेल. निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला भेट देणार आहेत. येथे ते स्वामी विवेकानंदांना भावसुमन अर्पण करण्यासाठी बांधण्यात आलेल्या स्मारक रॉक मेमोरियलमध्ये ध्यान करतील.
ध्यान मंडपममध्ये ३० मेच्या संध्याकाळपासून १ जूनच्या संध्याकाळपर्यंत मोदी ध्यानमग्न राहतील. असे मानले जाते की येथेच स्वामी विवेकानंदांना ‘मदर इंडिया’बद्दल दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती. 2019 च्या निवडणूक प्रचारानंतर पंतप्रधानांनी केदारनाथ गुहेत असेच ध्यान केले होते.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आध्यात्मिक मुक्कामासाठी कन्याकुमारीची निवड करण्याचा घेतलेला निर्णय विवेकानंदांची देशासाठीची दृष्टी साकार करण्याची त्यांची वचनबद्धता दर्शवते. मंगळवार दिनांक ४ जूनला निकाल लागणार आहे.
मोदी ज्या खडकावर ध्यान करतील त्या खडकाचा विवेकानंदांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला आहे आणि सारनाथला गौतम बुद्धांप्रमाणेच एका साधूच्या जीवनातही त्याचे महत्त्व आहे.
देशभर प्रवास करून विवेकानंद येथे पोहोचले आणि त्यांनी तीन दिवस ध्यानधारणा केली. त्यांनी येथे विकसित भारताचे स्वप्न पाहिले. त्याच ठिकाणी ध्यान केल्याने स्वामीजींच्या विकसित भारताच्या व्हिजनला जिवंत करण्याची पंतप्रधान मोदींची वचनबद्धता दिसून येते.
हे स्थान पवित्र ग्रंथांमध्ये भगवान शिवाचे व देवी पार्वतीचे ध्यान स्थान म्हणून देखील ओळखले जाते. हे ठिकाण भारताचे दक्षिणेकडील टोक आहे.कन्याकुमारी हे ते ठिकाण आहे जिथे पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी मिळते. हे हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र यांचा मिलन बिंदू आहे.





