नवी दिल्ली : शेजारी देश युद्धबंदीची याचना करत असताना भारताने पाकिस्तानसोबत कोणतीही अटी न लादता युद्ध का थांबवले. जर भारत योग्य स्थितीत असता, तर पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके) परत मिळवण्यापासून देशाला कोणी रोखले?, असा सवाल करत ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर हल्लाबोल केला. अरविंद सावंत म्हणाले, पहलगाम हल्ला झाला तेव्हा तेथे सशस्त्र दलाचे जवान किंवा पोलीस का नव्हते? ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलले जाते, तेव्हा त्याची सुरूवात ऑपरेशन सिंदूर का? इथून होते. पहलगामची घटना घडली म्हणून ऑपरेशन सिंदूर झाले. मी काही काळासाठी मंत्री होतो, जेव्हा मी इलेक्ट्रीक बसचे उद्घाटन करण्यासाठी कश्मीर येथे गेलो होतो, तेव्हा जागोजागी पोलीस, जवान उभे राहिलेले असायचे. मग असं काय झालं की त्या दिवशी पहलगाम येथे एकही सशस्त्र जवान, पोलीस नव्हते. आपले पर्यटक तेथे आलेले आहेत आणि तिथे पोलिसही नाहीत? तेथे जवान राहाणार नाहीत, असे आदेश कोणी दिले होते, चौकशी येथून झाली पाहिजे. तसेच पुलवामा हल्ल्याच्या वेळी सत्यपाल मलिक जे तुमच्या पक्षाचे गव्हर्नर होते. आजही त्यांचे विधान आठवा, ते आजही सांगतात की, वारंवार सांगून देखील तुम्ही जवानांना रस्त्याच्या मार्गाने पाठवले आणि जैश-ए-मोहम्मदने हल्ला केला. यामुळे ४० जवानांना आपला जीव गमवावा लागला. आजही त्याची चौकशी झाली नाही, असेही सावंत म्हणाले.