अरविंद केजरीवाल यांचा खळबळजनक दावा, म्हणाले- ‘सत्येंद्र जैन यांच्यानंतर मनीष सिसोदिया यांना अटक होऊ शकते.’

नवी दिल्ली – दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय सत्येंद्र जैन यांना मनि लॉंडरींग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली. कोलकाता येथील एका फर्मसोबत हवाला गैरव्यवहारात जैन यांचा सहभाग असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ईडीने दोन महिन्यांपूर्वी जैन आणि त्यांच्या कुटुंबियांची 4.71 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर आता ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे.
या अटकेनंतर आप पक्षावर भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे या टीकेवर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रतिउत्तर दिली आहे. तसेच सत्येंद्र जैन यांच्यावर झलेल्या कारवाईवर त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज डिजिटल पत्रकार परिषद घेऊन मनीष सिसोदिया यांच्या अटकेची भीती व्यक्त केली आहे. येत्या काही दिवसांत उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनाही अटक होऊ शकते, असे ते म्हणाले. त्यांना गोवण्याचा खोटा खटला तयार केला जात आहे.
अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले की,’मनीष सिसोदिया हे देशातील शैक्षणिक क्रांतीचे जनक आहेत. दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या १८ लाख मुलांना त्यांनी भविष्याची सोनेरी स्वप्ने दाखवली आहेत. जगभरातील लोकांना त्यांच्याकडून या शैक्षणिक सुधारणेबद्दल जाणून घ्यायचे आहे. अशी व्यक्ती कधीच भ्रष्ट असू शकत नाही. पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले,’सत्येंद्र जैन यांच्यासारख्या प्रामाणिक लोकांना अटक करून केंद्र सरकार आम्हाला अडचणीत आणत आहे, सार्वजनिक कामे विस्कळीत होत आहेत. सत्येंद्र जैन हेही निर्दोष आहे.’ असेही ते म्हणाले.





