Election News : ‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आवाहन’; सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सोमवार, दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही याचिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केली आहे.
यात विशेषतः निवडणूक आयोगाने सायंकाळी 6 नंतर टाकलेल्या तब्बल ७६ लाख मतांचा डेटा जतन करून न ठेवण्याबाबत गंभीर आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे या याचिकेवरील सुनावणीदरम्यान काय होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
सध्या देशात मत चोरीवरून वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणूक आयोगाकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. शिवाय आपण दिलेले मत नक्की कुठे गेले याचा विचार आता मतदाताही करू लागले आहेत.
त्यात महाराष्ट्रा लोकसभा निवडणुकीत वेगळा निकाल आणि विधानसभा निवडणुकीत अगदी त्याच्या विपरित निकाल लागले. त्याच वेळी मतदानात गडबड झाल्याचा आरोप विरोधकांनी करायला सुरूवात केली होती. महाराष्ट्रात मतदान कसे वाढले असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत.
या संदर्भातील माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक्स पोस्ट करत दिली आहे. ही याचिका आपण दाखल केली असुन त्यावर सुनावणी होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
निवडणूक कायद्यानुसार प्रत्येक मताचा डेटा सुरक्षित ठेवणे अनिवार्य आहे. इतक्या मोठ्या संख्येतील मतांबाबतची माहिती उपलब्ध न ठेवणे हे कायद्याचे गंभीर उल्लंघन आहे. या पार्श्वभूमीवर उद्याची सुनावणी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, महाराष्ट्राच्या राजकारणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, याआधी मुंबई उच्च न्यायालयात संध्याकाळी 5 नंतर झालेल्या 76 लाख मतदाना संदर्भातील न्यायालयीन लढाई ॲड. प्रकाश आंबेडकर हे लढत होते. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळ्यानंतर ॲड. प्रकाश आंबेडकर हे सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन लढाई लढत आहेत. यावर सर्वेच्च न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणे लागणार आहे.





