जामखेड तालुक्यात पुन्हा धक्कादायक घटना: सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची दोन मुलांसह विहिरीत उडी

जामखेड : रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जामखेड तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवारी (दि. ८) सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. रूपाली नाना उगले (वय २५) यांनी आपला मुलगा समर्थ (वय ५) आणि मुलगी चिऊ (वय ३) यांच्यासह घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
रूपाली यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी नाना उगले यांच्याशी झाला होता. सुरुवातीचे दीड वर्ष सुखाचे गेले; मात्र, त्यानंतर पती नाना आणि सासरे प्रकाश पंढरीनाथ उगले यांनी माहेरी जाण्यास मज्जाव करत पैशांची मागणी करून त्रास दिल्याची तक्रार आहे.
रूपाली यांचे वडील शिवाजी सकुंडे यांनी सांगितले की, यापूर्वी २ लाख रुपये दिले होते; परंतु गेल्या दोन वर्षांत ५ लाखांची आणखी मागणी झाली. ननंद मनिषा टाळके आणि नंदावा शिवाजी टाळके यांनीही पतीचे दुसरे लग्न लावण्याची धमकी देत छळ केला. या त्रासाला कंटाळून रूपालीने मुलांसह विहिरीत उडी घेत जीवन संपवल्याचा आरोप केला जात आहे.
रात्री उशिरा ग्रामस्थांनी विहिरीतून तिन्ही मृतदेह बाहेर काढले. खर्डा पोलिसांनी पती, सासरे, ननंद आणि नंदाव्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.





