कोयनानगर – कोयना विभागातील ढाणकल येथे काही दिवसांपूर्वी रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी शिवाजी पुनाजी कदम (वय ६०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच दोन दिवसांतच विभागातील नाव गावातील यशवंत बल्लाळ यांच्यावर रानटी गव्याने गंभीर हल्ला केला. जखमी बल्लाळ यांना वन्यजीव विभागाने उपचारासाठी कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या सलग दोन घटनांनी परिसरातील लोकांमध्ये भीती निर्माण केली आहे. ‘जंगलातील प्राणी माणसांकडे येतात की प्रशासन माणसांकडून दूर गेलंय,’ असा प्रश्न शेतकरी आणि ग्रामस्थ सतत उपस्थित करत आहेत. या प्रश्नाच्या उत्तरासाठी आता प्रशासकीय पातळीवर गंभीर उपाययोजना अपेक्षित आहेत. युनोस्कोने कोयना आणि सह्याद्री परिसराला जागतिक वारसा स्थळाचा (वर्ल्ड हेरिटेज) दर्जा दिला आहे. हा परिसर जैवविविधतेचा खजिना असून तो मानव- वन्यजीव संघर्षासाठी संवेदनशील आहे. व्याघ्र प्रकल्पाचे कुंपण वाघांना सुरक्षित ठेवते. परंतु, त्याच्याबाहेरील परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवन धोक्यात आहे. वन्यजीव विभागाकडून जनजागृती मोहिमा चालवल्या जात असल्या तरी प्राथमिक वैद्यकीय सुविधा नाहीत. रानगवे, बिबटे, अस्वल, वाघ यांचे हल्ले वाढले आहेत आणि जखमींना उपचारासाठी कराड किंवा सातारा गाठणे अनेकदा जीवघेणा ठरते. यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरुद्ध संताप आणि नाराजी वाढत आहे. ‘वन्यजीव संरक्षण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच मानवी जीवन वाचवणे शासनाचे कर्तव्य आहे,’ असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय वन्यजीव धोरण २०१७ व महाराष्ट्र राज्य मानव- वन्यजीव संघर्ष निवारण धोरण २०१९ मध्ये संवेदनशील प्रकल्प भागात आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाचे स्पष्ट आदेश आहे. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ देखील मानव व वन्यजीव यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे बंधनकारक मानतो. तरीही सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात या तरतुदींची अंमलबजावणी झालेली नाही. वन्यजीव विभागाकडे सीएसआर फंड, व्याघ्रप्रकल्प निधी आणि पर्यावरण मंत्रालयाचे अनुदान असून त्यातून आधुनिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे शक्य आहे. अशा केंद्रामुळे जखमींना त्वरित आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळू शकतात तसेच मानव- वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत होईल. वैद्यकीय सुविधांची गरज मानवावरील वन्यजीव हल्ल्यांच्या घटना अधूनमधून घडत असतात. अशा सकटाच्यावेळी या दुर्गम भागात माणसाला वाचविण्यासाठी काही ठोस स्वरुपाचे उपाय करण्याची आवश्यकता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. त्यासाठी आपत्कालीन वैद्यकीय केंद्र, २४ तास रुग्णवाहिका सेवा, तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक यांसारख्या सुविधा उभाराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.