प्रयागराजः उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथे १५ जानेवारीपासून महाकुंभमेळ्याला सुरूवात झाली आहे. ४५ दिवस चालणाऱ्या या कुंभमेळ्यात मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. मात्र, काल दुसऱ्या शाही स्नानासाठी (औन्नी अमावस्या) उसळलेल्या गर्दीत चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्देवी घटनेत आत्तापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्याच रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या घटनेनंतर उत्तरप्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यानंतर काल रात्री उशिरा दुसऱ्यांत माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भावूक झाल्याचे पाहिला मिळाले. तसेच रात्री उशिरा त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत मोठे निर्णय घेतले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाविकांना आवाहन करून घटनेचे कारण सांगितले. न्यायमूर्ती हर्ष कुमार, माजी डीजी व्हीके गुप्ता आणि निवृत्त आयएएस डीके सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय न्यायिक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. या घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. घटनेच्या चौकशीसाठी समिती गठित या घटनेबाबत मुख्यमंत्री नियंत्रण कक्ष, मुख्य सचिव नियंत्रण कक्ष आणि डीजीपीच्या नियंत्रण कक्षात दिवसभर बैठका सुरू होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राज्यपाल आनंदी पटेल आणि इतरांकडून आवश्यक मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या असल्याची माहिती देखील योगी आदित्यनाथ यांनी दिली. सर्व 13 आखाड्यांनीही खूप सहकार्य केले. चौकशी समितीकडून महिनाभरात अहवाल मागवण्यात येणार आहे. भविष्यात अशी दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. नेमकं काय घडलं? प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने दुसऱ्या शाही स्नानाचे (औन्नी अमावस्या) आयोजन करण्यात आले होते. यावेळी संगमाच्या ठिकाणी भाविकांनी गर्दी केली. अचानक उसळलेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती. सुरूवातीला मृत्यांचा आकाडा १० च्या आसपास होता. त्यानंतर आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यांचा आकडा ३० वर गेला आहे. तर काही भाविक जखमी झाले आहेत. यानंतर घडलेल्या घडनेनंतर अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. एकीकडे कुंभमेळ्यात देशभरातून आलेले सर्वसामान्य भाविकांना मिळणाऱ्या सुविधांबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच कुंभमेळ्यात व्हीआयपी नागरिकांना उच्च दर्जाच्या सोयी सुविधा दिल्या जात असल्याचे देखील बोलले जात आहेत. या घटनेनंतर विरोधकांनी उत्तरप्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घेराव घालत टीकेची झोड उठवत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रशासनाला सूचना मौनी अमावस्येच्या दिवशी प्रयागराजमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी रात्री उशिरा वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्या दरम्यान भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला कडक सूचना दिल्या आहेत. या बैठकीत प्रयागराज, कौशांबी, वाराणसी, अयोध्या, मिर्झापूर, बस्ती, जौनपूर, चित्रकूट, बांदा, आंबेडकर नगर, प्रतापगड, संत कबीर नगर, भदोही, रायबरेली आणि गोरखपूरच्या प्रशासकीय आणि पोलिस अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. तसेच प्रयागराज, अयोध्या, वाराणसी, मिर्झापूर आणि चित्रकूटच्या प्रशासनाला विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बैठकीत योगी आदित्यनाथ काय म्हणाले? प्रयागराजच्या सर्व रेल्वे स्थानकांवर मोठ्या संख्येने भाविक उपस्थित आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांशी समन्वय साधून रेल्वेचे कामकाज जलद करावे. लोकांना त्रास होऊ नये म्हणून परिवहन महामंडळाच्या जादा बसेस तैनात कराव्यात. सीमावर्ती भागात होल्डिंग एरिया तयार करण्यात आला आहे, जिथे गर्दीवर नियंत्रण ठेवता येईल. होल्डिंग एरियामध्ये अन्न, पाणी आणि वीज पुरवठ्याची सुरळीत व्यवस्था असावी. कोणत्याही भक्ताला मूलभूत सुविधांची कमतरता भासू नये. अयोध्या-प्रयागराज, कानपूर-प्रयागराज, फतेहपूर-प्रयागराज, लखनौ-प्रतापगढ-प्रयागराज, वाराणसी-प्रयागराज मार्गांवर वाहतूक विस्कळीत होऊ नये, याची काळजी घ्यावी. सीमावर्ती जिल्ह्यांना प्रयागराज प्रशासनाशी समन्वय साधून वाहतूक कार्यात सहकार्य करावे. रस्त्यावर विक्रेते आणि विनाकारण उभ्या असलेल्या लोकांची मोकळ्या जागेत व्यवस्था करावी. मुख्य रस्ते आणि प्रमुख धार्मिक स्थळांवर गस्त वाढवावी. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस व प्रशासनाने सतर्क राहावे. गर्दी नियंत्रणासाठी बॅरिकेडिंग आणि पार्किंग व्यवस्था सुव्यवस्थित करावी.