Amol Kolhe : जयंत पाटलांच्या पक्षांतराच्या चर्चेवर अमोल कोल्हेंच सर्वात मोठं विधान, स्पष्टच सांगून टाकलं….

Jayant Patil | Amol Kolhe : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पक्षांतराबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ‘माझं काही खरं नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका’, असे सूचक वक्तव्य जयंत पाटलांनी एका कार्यक्रमात बोलताना केले होते. त्यानंतर ते शरद पवारांची साथ लवकरच सोडणार अशी चर्चा सुरू झाली. मात्र, आता या विधानावर त्यांनी स्पष्टीकरण दिले.
‘नाराजी वगैरे काही नाही. माझी बोलायचीच चोरी झाली आहे. मी भाषण केलेलं, त्याचा संदर्भ तुम्ही काढून बघा., असे म्हणत त्यांनी त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. तसेच, आपण नाराज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीचे आझाद मैदानात आंदोलन सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले होते. त्यानंतर ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा रंगली होती.
दरम्यान, या प्रकारावर आता त्यांच्या पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाष्य केलं आहे. “जयंत पाटील यांच्याविषयी सातत्याने अफवा पसरविल्या जात आहेत. एखाद्या व्यक्तीविषयी अशा पध्दतीने गैरसमज पसरविणे निश्चितच गंभीर आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं आहे.
‘या’ घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या –
सध्याचे राजकारण, समाजकारण याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. कृषिमंत्री माणिक कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात न्यायालयाने दिलेला निर्णय हा कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
कोकाटे प्रकरणी न्यायलयाने केलेली टिप्पणी सामान्य माणसाला अगतिक करणारी आहे. न्याय कुणाकडे मागायचा हा प्रश्न आहे. मस्साजोगची घटना असो किंवा अहिल्यानगर येथील १८ वर्षाच्या युवकाची हत्या असो. या सर्व घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत असंही ते म्हणाले.
जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण, काय म्हणाले एकदा पाहा….
आपल्या विधानावर स्पष्टीकरण देत जयंत पाटील म्हणाले की, नाराजी वगैरे काही नाहीये. कसं आहे की माझी बोलायचीच चोरी झाली आहे. मी भाषण केलेलं, त्याचा संदर्भ तुम्ही काढून बघा. शक्तीपीठ रस्त्याला विरोध करण्यासाठी जो मोर्चा आलेला, त्यांच्यासमोर भाषण केलं.
राजू शेट्टी यांनी याचा झेंडा हातात घेतला म्हटल्यावर काहीही अडचण नाही. आता हा विनोदाचा भाग होता की राजू शेट्टींचा आमच्यावर विश्वास नाही. त्यांना आम्ही उभं राहायला सांगत होतो. त्यामुळे तुम्ही माझं काही गृहीत धरू नका, तुमचं आंदोलन सुरू ठेवा. तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, अशी त्यामागची भावना होती., असे ते म्हणाले.
यातून मी पक्षावर नाराज आहे आणि मी पक्ष सोडणार आहे इथपर्यंत चर्चा गेली. मी रोज स्पष्टीकरण देणंही बरोबर नाही, असे म्हणत जयंत पाटलांनी नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
हा इशारा शरद पवारांना होता का? असा प्रश्न देखील त्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, ‘आम्ही एका कुटुंबातील आहोत, आम्ही असं एकमेकांना इशारा देत बसत नाहीत.’





