Sharad Pawar : अमित शाहांचा टोन अतिटोकाचा; हे काय कोल्हापूरचे संस्कार.. शरद पवारांचे अमित शाहांवर जोरदार टीकास्त्र

कोल्हापूरः अमित शाह सातत्याने हल्ली जे काही बोलतात त्याची नोंद महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेतृत्वाने घेतलेली आहे. मात्र, अमित शाह यांचा बोलण्याचा टोन अतिटोकाचा आहे. देशाचे गृहमंत्री अधिक तारतम्य ठेवून भाष्य करेल, अशी अपेक्षा असते. त्याची प्रचिती तिथून येत नाही. खरं म्हणलं तर हे काय कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत. अमित शाह हे कोल्हापूरला शिकले की कुठं शिकले मला माहिती नाही, अशी खरमरीत टीका मा. केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केली. ते कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
काल बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. उद्धव ठाकरे यांनी भाषणा दरम्यान गृहमंत्री अमित शहांवर टीकेची झोड उठवली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्ल काहीही बोलले नाहीत. या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवारांनी वरील प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरेंच्या सभेला अधिक उपस्थिती
तसेच या पत्रकारांशी संवाद साधत आगामी निवडणुका, उदय सामंत यांनी आमदार फुटण्याचे केलेले दावे, दावोसमधील महाराष्ट्रासाठीची गुंतवणूक, दोन्ही शिवसेनेचे मेळावे याबाबत भाष्य केले. काल झालेल्या दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याबाबत शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवत ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करण्यासाठी दोघांनी कार्यक्रम घेतले. बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करण्याचा अधिकार आपला आहे असे दोघांनाही वाटते त्याची प्रचिती पाहिली असल्याचे पवारांनी सांगितले. तसेच लोकांची उपस्थिती पाहिली तर उद्धव ठाकरेंच्या सभेला अधिक होती, असे निरीक्षणावरुन दिसत असल्याचे पवार म्हणाले.
ते लोक ठाकरेंची सेना सोडतील असे वाटत नाही
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उबाठा गटातील काही आमदार, खासदार संपर्कात असल्याचे सांगितले होते. यावर उदय सामंत दावोसला भांडवली गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते की लोक फोडायला गेले होते ते माहिती नाही. त्यांनी जी काही विधान केली आहेत, ती मुख्यमंत्र्यांच्या दावोसचा उद्देश होता त्याला सुसंगत नव्हती, असे पवार म्हणाले. मी काही फोटो पाहिले, ते लोक ठाकरेंची सेना सोडतील असे वाटत नाही. तसेच काही माणसं अशी आहेत की ते पक्ष आणि बाळासाहेबांची विचारधारा अजिबात सोडणार नाहीत, असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी यावेळी बोलताना दिले.





