मुंबई/नागपूर – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी लोकसभेत केलेल्या वक्तव्यानंतर त्याचे राज्यासह हिवाळी अधिवेशनातही पडसाद उमटले. यावरून विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दरम्यान, महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपला धारेवर धरले. कॉंग्रेस नेते नितीन राऊत म्हणाले, बाबासाहेबांचे नाव घेण्याचा इतका द्वेष का आहे, या सर्व बाबी यांना संविधानामुळे, राज्यघटनेमुळे यांच्यावर किती परिणाम होत असेल, किती द्वेष करत असतील. हा केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही. हा संपूर्ण देशाचा अपमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी संविधान निर्माते असतील, पण आमच्यासाठी एक मार्गदाता, भाग्यविधाता आणि ईश्वरदेखील ते आहेत. हे सभागृह संविधानाने बनलेले सभागृह आहे आणि या सभागृहामध्ये संविधानावर जे काही म्हटले जात असेल किंवा संविधान निर्मात्यावर बोलले जात असेल, तर ते म्हणणे मांडण्याचा आम्हाला संपूर्ण अधिकार आहे. या देशाला संविधान काँग्रेस पक्षाने दिले, हे विसरता कामा नये, असेही नितीन राऊत म्हणाले. यावरून शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, महात्मा गांधी, आंबेडकर जगाचे विचारस्त्रोत ठरले. तुम्ही ज्या सभागृहात उभे आहात त्या सभागृहाची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे झाली आहे. ते आता बोलू शकतात ते आंबेडकरांच्या संविधानामुळे बोलू शकतात. आंबेडकर ही ‘फॅशन’ नसून ‘पॅशन ’ असल्याचे ते म्हणाले. विरोधकांनी केला सभात्याग – विधान परिषदेत विरोधक शहांच्या वक्तव्याच्या निषेधात आक्रमक झाले. मात्र सभापतींनी त्यावर बोलू न दिल्याने विरोधकांनी सभात्याग करत घोषणाबाजी केली. यावेळी आमदार सतेज पाटील, शशिकांत शिंदे, डॉ. प्रज्ञा सातव, ॲड. अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले आदी उपस्थित होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कामकाजावर बहिष्कार घातला. नीलम गो-हे विरोधकांवर संतापल्या – बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित करुन तुम्ही राजकारण करत आहात. त्यामुळे मी तुम्हाला मुद्दा मांडण्याची संमती देणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्ही सभागृहात आहोत. अशावेळी चुकीच्या नियमानुसार सभागृहाची तुम्ही दिशाभूल करत आहात. त्यामुळे मी बोलण्याची संमती तुम्हाला मुळीच देणार नाही, असा शब्दांत नीलम गो-हे यांनी विरोधकांना ठणकावले. शहा यांच्या या विधानावरुन वाद – मंगळवारी राज्यसभेत राज्यसभेत राज्यघटनेवर झालेल्या चर्चेदरम्यान शहा म्हणाले होते, ‘ही आता फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर… देवाचे एवढे नाव घेतले असते तर सात जन्म स्वर्ग मिळाला असता. मोदी आले शहांच्या समर्थनार्थ, म्हणाले- काँग्रेस आंबेडकरांवर नाटक करत आहे – या वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले. मोदींनी X वर 6 पोस्ट केल्या आहेत. पंतप्रधान म्हणाले, ‘काँग्रेस आता आंबेडकरांवर नाटक करत आहे. पंडित नेहरूंनी निवडणुकीत आंबेडकरांच्या विरोधात प्रचार केला होता. काँग्रेसने त्यांना भारतरत्न देण्यास नकार दिला. एससी-एसटीच्या विरोधात सर्वाधिक हत्याकांड काँग्रेसच्या काळात झाले आहेत.