Ambegaon News – आंबेगाव तालुक्यातील काही गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असून दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी तालुका प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या असून पंचायत समिती आंबेगावच्या माध्यमातून तीन गावांमध्ये पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. यासाठी काही विहिरी अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती कैलास काळे यांनी दिली. तालुक्यातील कारेगाव, थुगाव आणि पारगावतर्फे खेड या गावांसह परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील सुमारे सहा हजारांहून अधिक नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी खासगी टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. कारेगाव येथील कानिफनाथवस्ती, माळवस्ती, बेंदवस्ती आणि गावठाण परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर थुगाव येथील सवाईमळा, नागुमळा, गणेशनगर, ठाकरवाडी, माळीमळा, कोल्हारवाडी व गावठाण भागात टँकरने पाणी दिले जात आहे. पारगावतर्फे खेड परिसरातील मनकरवस्ती, चिखलेवस्ती, गंगेवाडी, पवार-घुलेवस्ती, चव्हाणवस्ती, माळीमळा, बागलवस्ती, ढगे, ठाकरवाडी, सावंतवस्ती, भागडेवस्ती, पवळेवस्ती, पठारेवस्ती तसेच इतर वाड्यांवरही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, भावडी, कुरवंडी, पेठ, निघोटवाडी, दस्तुरवाडी, माळीण, पहाडदरा आणि वडगावपीर या ग्रामपंचायतींचे प्रस्ताव मंजुरीसाठी प्राप्त झाले असून या गावांमध्येही लवकरच पाण्याचे टँकर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. प्रस्ताव सादर करा ज्या भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे, अशा ग्रामपंचायतींनी पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज व उपसभापती ज्योती पारधी यांनी केले आहे.