Mehbooba Mufti : “मोहरमच्या मिरवणुकांना परवानगी द्या आणि तरुणांची सुटका करा”; मेहबुबा मुफ्तींचे प्रशासनाला आवाहन
मोहरम हा केवळ एक धार्मिक विधी नसून तो या प्रदेशाच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. लोकांच्या भावना आणि घटनात्मक अधिकारांचा आदर करून या धार्मिक मिरवणुकांना प्रशासनाने परवानगी दिली पाहिजे.

Mehbooba Mufti – जम्मू-काश्मीरमध्ये मोहरमच्या मिरवणुकांना परवानगी द्यावी आणि इराणमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निदर्शनांदरम्यान सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेल्या तरुणांची तत्काळ सुटका करावी, असे आवाहन पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी मंगळवारी प्रशासनाला केले.
बुधवारपासून इस्लामिक नववर्षाचा पहिला महिना मोहरम सुरू होत असून, दहाव्या दिवशी म्हणजेच २६ जून रोजी आशूराच्या मिरवणुका काढल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे निवेदन दिले आहे.
मोहरम हा केवळ एक धार्मिक विधी नसून तो या प्रदेशाच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. लोकांच्या भावना आणि घटनात्मक अधिकारांचा आदर करून या धार्मिक मिरवणुकांना प्रशासनाने परवानगी दिली पाहिजे.
इराणशी संबंधित अलीकडच्या घडामोडींवरून झालेल्या निदर्शनांत सहभागी झालेल्या अनेक तरुणांवर कठोर कायदे लावून त्यांना जम्मू-काश्मीरबाहेरील तुरुंगात डांबण्यात आले आहे. ही कारवाई अत्यंत चिंताजनक असून, यामुळे तरुण मुख्य प्रवाहापासून दुरावण्याचा धोका आहे, अशी भीती मुफ्ती यांनी व्यक्त केली.
मोहरमच्या काळात भाविकांसाठी वाहतूक व्यवस्था, आरोग्य सुविधा, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि वीज यांसारख्या अत्यावश्यक सेवा चोख ठेवण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली. मोहरम हा चिंतन, बलिदान आणि करुणेचा काळ आहे.
इमाम हुसेन यांचे मूल्य आणि बलिदान लोकांना न्याय व मानवी प्रतिष्ठेसाठी उभे राहण्याची प्रेरणा देते. अशा संवेदनशील आणि पवित्र महिन्यात सरकारने लोकांशी संवाद साधून त्यांच्या जखमांवर फुंकर घातली पाहिजे; दंडात्मक आणि कठोर कारवाई करून त्यांच्या वेदना वाढवू नयेत असे त्या म्हणाल्या.
मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीर प्रशासनाला आवाहन केले की, त्यांनी दाखल केलेल्या सर्व प्रकरणांचा तातडीने आढावा घ्यावा, ताब्यात घेतलेल्या तरुणांची सुटका करावी आणि पुढील कोणतीही बळजबरीची कारवाई टाळावी. लोकांच्या समस्या आणि भावना समजून घेण्यासाठी संवाद हाच सर्वात प्रभावी मार्ग असल्याचेही त्यांनी शेवटी अधोरेखित केले.





