Allergy Awareness: आजकाल ऍलर्जीचा त्रास लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना होताना दिसतो. पण यामागची कारणं शोधण्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही. तज्ज्ञांच्या मते, बाजारात मिळणाऱ्या अनेक प्रक्रियायुक्त (प्रोसेस्ड) पदार्थांमध्ये विविध रसायनांचा वापर केला जातो. ही रसायने शरीराला न पटल्यास ऍलर्जी, त्वचेचे विकार, श्वसनाचे त्रास किंवा पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. साखर, तेल आणि तूप साखर शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत काही रसायनांचा वापर केला जातो. काही संवेदनशील व्यक्तींमध्ये यामुळे त्वचेवर पुरळ, खाज, लाल चट्टे किंवा श्वसनाचा त्रास दिसू शकतो. तसेच वनस्पती तूप, हायड्रोजेनेटेड तेल (डालडा) किंवा रिफाइंड तेल तयार करताना विविध रासायनिक प्रक्रिया केल्या जातात. या तेलांचा अतिरेक केल्यास पचनाच्या तक्रारी, घशात खवखव किंवा अॅसिडिटीसारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो ताजं, घरगुती आणि कमी प्रक्रियायुक्त तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो. Allergies फ्लेवर्स आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज आइस्क्रीम, बिस्किटे, जॅम, जेली, सॉस, लोणची यांसारख्या पदार्थांमध्ये टिकवण्यासाठी प्रिझर्व्हेटिव्ह्ज वापरले जातात. काही लोकांना यामुळे पोटदुखी, गॅस्ट्रिक समस्या किंवा त्वचेच्या ऍलर्जी होऊ शकतात. तसेच कृत्रिम फ्लेवर्स (उदा. व्हॅनिला फ्लेवर) हे नैसर्गिक घटकांऐवजी कृत्रिमरीत्या तयार केलेले असतात. संवेदनशील व्यक्तींमध्ये यामुळेही ऍलर्जिक प्रतिक्रिया दिसू शकतात. ऍलर्जीचा खोकला म्हणजे काय? धूळ, परागकण, बुरशी, प्रदूषण किंवा धूर यांसारख्या बाह्य घटकांमुळे शरीरात हिस्टामाईन नावाचं रसायन तयार होतं. त्यामुळे शिंक, नाक वाहणे, घसा खवखवणे आणि खोकला अशी लक्षणे दिसतात. काही वेळा हा खोकला साध्या सर्दीसारखा वाटतो, पण तो ऍलर्जीमुळेही असू शकतो. जर खोकला सतत राहत असेल, झोपमोड होत असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. Allergies काय काळजी घ्यावी? शक्यतो घरगुती आणि ताजे पदार्थ खावेत. पॅकबंद पदार्थांचा अतिरेक टाळावा. धूळ, धूर, परागकण यापासून बचाव करावा. घर स्वच्छ ठेवावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधे घ्यावीत. गरज असल्यास ऍलर्जी चाचणी करून घ्यावी. आयुर्वेदानुसार, शरीराची पचनशक्ती (अग्नी) मजबूत असेल तर अनेक त्रास टाळता येतात. त्यामुळे संतुलित आहार, योग्य जीवनशैली आणि नियमित तपासणी यांना महत्त्व दिलं पाहिजे. सोप्या शब्दांत सांगायचं तर शरीराला न पटणाऱ्या घटकांपासून दूर राहणं आणि योग्य वेळी उपचार घेणं हेच ऍलर्जीपासून वाचण्याचं मुख्य सूत्र आहे.