Alandi News – तीर्थक्षेत्र आळंदी येथील कचरा डेपोला लागलेली आग तिसर्या दिवशीही पूर्णपणे आटोक्यात आलेली नसून परिसरात दाट धुराचे साम्राज्य पसरले आहे. धुरामुळे डेपो परिसरात काम करणारे कर्मचारी तसेच ये-जा करणार्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. डेपोवर कचरा टाकण्यासाठी जाणार्या ट्रॅक्टर व घंटागाड्यांवरील कर्मचार्यांना श्वसनाचा त्रास, डोळे-नाक-घशात जळजळ यांसारख्या तक्रारी जाणवत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. कचरा जळताना निर्माण होणार्या विषारी वायूंमुळे दीर्घकालीन आजारांचा धोका संभवतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. उष्णतेच्या दिवसांत वा वारा नसताना धूर जमिनीवरच रेंगाळत असल्याने स्थानिक हवेची गुणवत्ता खालावत आहे. हवेत सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढल्याने फुफ्फुसांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षभरात डेपोवर वारंवार आगी लागल्याच्या घटना घडल्या असून, त्यातून होणार्या प्रदूषणाकडे संबंधित विभागाने पुरेसे लक्ष दिले नसल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. ज्ञानपीठ प्रकल्पावरही परिणाम? या परिसरात संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्याची घोषणा यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती; मात्र प्रस्तावित ज्ञानपीठाच्या काही भागांवरही आगीचा धूर पसरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या क्षेत्रावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. डेपोची दुरवस्था; अहवालाचा अभाव आगीमुळे डेपोला लावलेले संरक्षक पत्रे जळून खाली पडले आहेत. परिसरातील विद्युत डीपी बंद असून वीजपुरवठा खंडित झाल्याचे दिसून येते. गेल्या वर्षभरातील आगींमध्ये नेमके किती नुकसान झाले, याबाबत कोणताही अधिकृत अहवाल जाहीर न झाल्याने प्रशासकीय पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.