Alandi News – आळंदी शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि नागरिकांना थेट दिलासा देण्यासाठी नगरपरिषदेच्या सभागृहात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मिळकतकर सवलतीपासून ते शहर हद्दवाढीपर्यंतच्या विविध विषयांवरील ठरावांना सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली.आळंदीच्या विकासासाठी भरीव योगदान दिल्याबद्दल नगरपरिषद शाळा क्रमांक ४ ला ‘अजित पवार‘ यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या शाळेच्या भव्य इमारतीसाठी १० कोटींचा निधी उपलब्ध झाला होता. तसेच, इंद्रायणी नदी घाट परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि डिजिटल देखरेख यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षेच्या दृष्टीने हा ठराव महत्त्वाचा मानला जात आहे.तीर्थक्षेत्र विकास कामांमध्ये स्थानिक प्रशासनाचा प्रभावी सहभाग असावा, यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीवर नगराध्यक्षांना ‘पदसिद्ध सदस्य’ म्हणून समाविष्ट करण्याचा ठराव मंजूर झाला. यामुळे प्रशासन आणि मंदिर समितीमध्ये कामांचा समन्वय अधिक चांगल्या प्रकारे साधला जाणार आहे. शहरातील ऐतिहासिक कुंडांचे जतन, गाळ काढणे आणि सुशोभीकरण करण्याचा ठरावही सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना तसेच स्थानिक व्यावसायिकांना लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. नगरपरिषद हद्दवाढीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याचाही निर्णय घेण्यात आला. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि नागरी सुविधा वाढविणे ही या उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. नवीन क्षेत्रांचे सर्वेक्षण, संबंधित विभागांशी समन्वय आणि नागरिकांचा सहभाग या टप्प्यांद्वारे ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.नगरपरिषद हद्दीतील हवेली तालुक्यातील परिसर आळंदी पोलीस ठाणे (खेड तालुका) अंतर्गत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यात्रा काळातील गर्दी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल, असे सांगण्यात आले. नगरपरिषदेने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयांमुळे आळंदी शहराच्या नियोजित आणि संतुलित विकासाला मोठी चालना मिळणार आहे. मिळकतकर ‘अभय’ योजनेला मुदतवाढ मिळकतकर वसुलीसाठी सुरू असलेल्या ‘अभय योजने’ला आता १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत थकबाकीदारांना दंड व व्याजात ५० टक्के सवलत मिळणार आहे. जास्तीत जास्त करदात्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे आणि मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे.