आळंदी: ज्ञानभूमी प्रकल्पाची गती, इंद्रायणी प्रदूषणमुक्तीसाठी डीपीआर, ज्ञानेश्वरीसाठी एक कोटीचा निधी – मंत्री उदय सामंत

आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आळंदीत भक्तिमय वातावरणात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि ह.भ.प. भागवत महाराज शिरवळकर यांच्या अमृतवाणीने हजारो भाविक तल्लीन झाले. या विशेष प्रसंगी मराठी भाषा व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माऊलींचे दर्शन घेऊन अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात सहभाग घेतला. देवस्थान समितीने त्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी त्यांनी आळंदी देवस्थानच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना देणारी महत्त्वपूर्ण घोषणा केली.
ज्ञानभूमी प्रकल्पाला गती –
आळंदी देवस्थानच्या गायरान जमिनीवर सुमारे ४५० एकर जागेत नियोजित ज्ञानभूमी प्रकल्प वारकरी केंद्रित बहुउद्देशीय आणि नाविन्यपूर्ण आहे. विश्वस्त मंडळाने याची सविस्तर माहिती सादर केली. हा प्रकल्प वारकऱ्यांसाठी अध्यात्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या उपयुक्त ठरेल, असे सामंत यांनी सांगितले. “या प्रकल्पाला लवकर मार्गी लावण्यासाठी मी शासनाकडे वकिली करेन आणि आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करेन,” असे आश्वासन त्यांनी दिले. हा प्रकल्प आळंदीच्या वारकरी परंपरेला नवे वैभव देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ज्ञानेश्वरीसाठी एक कोटीचा निधी –
माऊलींच्या ७५० व्या आणि ७५१ व्या जन्मवर्षानिमित्त भाविकांना ग्रंथराज ज्ञानेश्वरी अल्पदरात उपलब्ध व्हावी यासाठी सामंत यांनी एक कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. “ज्ञानेश्वरीच्या छपाईसाठी हा निधी उपलब्ध करून देऊन मराठी भाषा आणि माऊलींचा वारसा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवला जाईल,” असे त्यांनी सांगितले. याशिवाय, पुढील वर्षी माऊलींच्या ७५१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा मंत्रालयाच्या माध्यमातून कीर्तन महोत्सव आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला, ज्यामुळे वारकरी संप्रदायाचा वारसा राज्यभर पोहोचेल.
इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्तीसाठी डीपीआर –
पवित्र इंद्रायणी नदीच्या प्रदूषणावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सामंत यांनी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले. “लवकरच सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून इंद्रायणी नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी कार्यवाही केली जाईल,” असे त्यांनी जाहीर केले. हा उपक्रम आळंदीच्या पर्यावरणीय आणि आध्यात्मिक महत्त्वाला पुनर्जनन देणारा ठरेल, अशी भाविकांना आशा आहे.
मराठी भाषेचा अभिजात दर्जा –
सामंत यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. “मराठी भाषेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवताना मी राज्यमंत्री होतो आणि आता कॅबिनेट मंत्री म्हणून अभिजात दर्जाचा जीआर आणण्याचे भाग्य मला मिळाले. हे सर्व माऊलींच्या आशीर्वादाने शक्य झाले,” असे ते म्हणाले. मराठी भाषा ही ज्ञानेश्वर माऊलींपासून सुरू झाल्याचे सांगत त्यांनी ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले.
या भव्य सोहळ्यात आ. विलास लांडे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखीसोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, हभप चैतन्य महाराज कबीर, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड. रोहिणी पवार, नारायण महाराज जाधव, धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले, शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हजारो भाविकांच्या उपस्थितीत आळंदी भक्तिमय वातावरणात न्हाली.





