अक्षय शिंदे मृत्यू प्रकरण ! हा एन्काउंटर नाही! मुंबई हाय कोर्टाने पोलिसांच्या कारवाईवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. हे एन्काउंटर आता वादग्रस्त ठरले असून कोर्टानेही यावरून ताशेरे ओढले आहेत. एन्काउंटरचा संपूर्ण घटनाक्रमच संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एवढंच नव्हे तर हा एन्काउंटर नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत जखमी पोलिसाचे वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आदी पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच याप्रकरणी उद्या, गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. पोलीस वाहनातून आरोपीला घेऊन जात असताना चार पोलीस अधिकाऱ्यांची गरज काय होती? यासाठी अतिरिक्त माणसांचा वापर झाला असे वाटत नाही का?, असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला. तसेच, त्याने हातातून पिस्तुल खेचून घेतली तेव्हा चार पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला रोखायला हवे होते. चार पोलिसांना तो आवरता आला नाही का?, असाही प्रश्न न्यायालयाने विचारला.
अक्षयने तीन गोळ्या झाडल्या असे तुम्ही म्हणालात. एक गोळी पोलिसाला लागली. मग इतर दोन गोळ्या कुठे आहेत? अशा परिस्थितीत आपण स्वसंरक्षणाकरता पायावर किंवा हातावर गोळी मारतो. गोळी कुठे मारावी याचे प्रशिक्षण पोलिसांना दिले जाते, अशी सरबत्ती न्यायालयाने केली. त्यावर सरकारी वकिलांनी सांगितले की, पोलिसांनी विचार केला नाही, त्यांनी घटनेवर तत्काळ प्रतिक्रिया दिली.
त्याने जेव्हा हातात पिस्तुल घेऊन कोणावर रोखले तेव्हा इतर अधिकाऱ्यांनी त्याला रोखले का नाही. तो फार स्ट्राँग माणूस नव्हता. त्यामुळे हे स्वीकारणे कठीण आहे. हा एन्काऊंटर असू शकत नाही, असेही न्यायमूर्ती म्हणाले. त्याने यापूर्वी कधी शस्त्र वापरली आहेत का? जर त्याने पिस्तुल लोड केली असे तुम्ही म्हणत असाल तर त्याने याआधी शस्त्र वापरली असतील, असेही न्यायमूर्तींनी विचारले. त्यावर सरकारी वकील म्हणाले, त्याने पिस्तुल लोड केली नाही. झटापटीत पिस्तुल लोड झाली होती. त्याने याआधी कधीही शस्त्रे वापरली नाहीत.गंभीर गुन्हा असलेल्या माणसाला घेऊन जात असताना एवढा निष्काळजीपणा का दाखवला. याबाबत नियमावली काय आहे? त्याच्या हाताला बेड्या होत्या का? असा सवालही न्यायमूर्तींनी विचारला.
तो राजकारणाचा बळी ठरला
अक्षय शिंदे याच्या वडिलांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. बदलापूर प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी माझ्या मुलाची हत्या करण्यात आल्याचा आरोप अक्षयच्या वडिलांनी केला आहे. या याचिकेत अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी सांगितले की, या प्रकरणातील सहा आरोपी अद्यापही फरार आहेत. तेदेखील तितकेच जबाबदार आहेत. माझ्या मुलावर खोटे आरोप लावण्यात आले आणि तो राजकारणाचा बळी ठरला, असे याचिकेत नमूद केले आहे.
न्यायालयात उपस्थित केले प्रश्न
१. चार पोलीस अधिकारी असताना आरोपी आक्रमक कसा होऊ शकतो?
२. अक्षयने गोळी कशी लोड केेली?
३. अक्षयने चालवलेली गोळी उलटी येऊन कोणाला लागली कशी नाही?
४. आरोपीने तीन बुलेट झाडल्या. एक पोलिसाला लागली, तर दुसऱ्या दोन बुलेट कुठे आहेत?
५. पोलिसांनी गोळी झाडताना आरोपीच्या पायावर किंवा हातावर का झाडली नाही?
६. आम्हाला कोणत्याही गोष्टीवर संशय नाही, आम्हाला फक्त सत्य जाणून घ्यायचे आहे.
७. गंभीर गुन्ह्यांचा आरोप असलेल्या व्यक्तीला तुम्ही घेऊन जात असताना एवढा निष्काळजीपणा का झाला?
८. एसओपी म्हणजे काय? त्याला बेड्या घातल्या होत्या का?
९. तुम्ही पिस्तुलावरील बोटांचे ठसे घेतले का?





