दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल एक मोठं वक्तव्य केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावेत ही अनेकांची इच्छा आहे. त्यानुसार, तो निर्णय सुप्रिया सुळे घेतील असं शरद पवारांनी स्पष्ट केले. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? राजकीय तज्ज्ञांपासून पक्ष कार्यकर्त्यांमध्येही या विषयावर चर्चा रंगलेली असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, आगामी काळातील पक्षातील गळती थांबवण्याच्या अनुषंगाने शरद पवार यांच्याकडून वक्तव्य आली असतील, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनिकरणासंदर्भात अजित पवारांनी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीमध्ये विधान केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती लागण्याची शक्यता असल्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा केली जात आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. तसेच आगामी काळातील पक्षातील गळती थांबवण्याच्या अनुषंगाने शरद पवारांकडून वक्तव्य आली असतील अशी माहिती देखील अजित पवारांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून पक्षाला राम राम करण्याची हालचाल सुरू असेल म्हणूनच शरद पवारांकडून पक्ष एकत्रीकरणाबाबतचे सुतोवाच केले असतील,’ असं अजित पवार आमदारांच्या बैठकीमध्ये म्हणाले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
काय म्हणाले होते शरद पवार?
पक्षातील काही नेते आणि कार्यकर्ते अजित पवार यांच्यसोबत जाण्यास उत्सुक आहेत. हे राजकीय गणित आहे, पण अंतिम निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा. त्यांच्यावर पक्षाच्या भवितव्याची मोठी जबादारी आहे. असं शरद पवार यांनी म्हटले होते.
यासोबतच पक्षाने सत्तेत सहभागी व्हायचे की विरोधी बाकांवर राहायचे हा निर्णय खासदार सुप्रिया सुळे यांनी घ्यावा, असे देखील शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. एका इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान शरद पवार यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा केली जात आहे.




