Ajit Pawar : कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार; अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण

अकोला : राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून योग्य वेळी घेतला जाणार आहे. अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांच्याशी चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी अकोला दौऱ्यावर आले. यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे सुरू आहे. या प्रकरणावर अजित पवार यांनी त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय योग्य वेळी घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांचे किंवा इतर कुठलेही प्रश्न असो, ते चर्चेतून सुटत असतात. बच्चू कडू यांच्याशी चर्चा करण्यास राज्य सरकारची तयारी आहे. सरकार व प्रशासन यासंबंधी नियमितपणे त्यांच्या संपर्कात असल्याचेही पवार यांनी सांगितले.
यावेळी अजित पवारांनी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या कंपन्या व दुकानदारांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले. सरकार खते व बी बियाण्यांचे लिकिंग करणाऱ्या दुकानदार व कंपन्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणी दुकानदारांचे परवाने रद्द केले जातील, तर कंपन्यांवरही योग्य ती कारवाई केली जाईल, असा गर्भित इशारा अजित पवार यांनी दिला. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देखील दिली जाईल. त्यासाठी योग्य वेळ येण्याची गरज आहे. लाडक्या बहिणींनाही दरमहा मदत देण्यास सरकार तत्पर आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.





