मोरगाव (पुणे) – राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. मात्र, सध्याचे सरकार केवळ दोन जणांचे आहे. मंत्रीमंडळ अजून अस्तित्वात आले नसून नव्या सरकारने विकासकामांना स्थगिती दिली आहे. मात्र, सत्ता मिळणाऱ्यांनी हुरळुन जाऊ नये, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला. मोरगाव (ता. बारामती) येथे विविध विकासकामांचे उद्घाटन विरोधी पक्षनेते पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर भव्य शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वर कारखाना चेअरमन पुरुषोत्तम जगताप, व्हाइस चेअरमन आनंदकुमार होळकर, सरपंच निलेश केदारी, उपसरपंच नेवसे, माजी सरपंच पोपट तावरे, किरण गुजर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भरत खैरे, सोमेश्वरचे संचालक किसन तांबे, हनुमंत भापकर, दत्तात्रय ढोले, मुरलीधर ठोंबरे, भाऊसाहेब कांबळे, माजी सभापती अमृता गारडे, पांडुरंग गारडे उपस्थित होते.
पवार म्हणाले की, सध्याचे सरकार हे केवळ दोघांचे आहे. नव्या सरकारने विकासकामांना खिळ घातली असली तरी पुणे जिल्ह्यासह बारामती तालुक्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निधी कमी पडू देणार नाही. मोरगावचा सुनियोजित विकास होण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहेत. सरपंच निलेश केदारी यांनी सातत्याने पाठपुरावा करुन ग्रामपंचायत नुतनीकरणासह केलेल्या विकासकामांबाबत कौतुक पवार यांनी केले. सूत्रसंचालन सोमनाथ कदम यांनी केले. सरपंच निलेश केदारी यांनी आभार मानले.