नवी दिल्ली/बिजिंग : कोरोना व्हायरसने हाहाकार माजवलेल्या वुहान शहरातून 323 भारतीय आणि मालदिवच्या सात नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे दुसरे विमान रविवारी सकाळी दाखल झाले.
वुहानमधून हे विमान सकाळी तीन वाजून 10 मिनिटांनी दाखल झाले. यापुर्वी शनिवारी सकाळी एक विमान भारतात दाखल झाले. त्यात 324 प्रवासी होते. त्यात तीन लहान मुले आणि 211 विद्यार्थ्यांचा समावेश होता.
दरम्यान, चीनमधील वुहान शहरातून नागरिकांना मोठ्या संख्येने स्थलांतरीत करून भारतात आणले जात असताना केरळमध्ये कोरोना विषाणूचा दुसरा बाधीत आढळला आहे.
हा रूग्णही चीनला जाऊन आला होता, त्याला एका रुग्णालयातील विलगता कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थीर असून त्याला काटेकोर निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. दुसरा रुग्ण सापडल्यानंतर राज्य सरकारने सतर्कतेच्या आदेशात वाढ केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आणीबाणीच्या काळातील मार्गदर्शक तत्वानुसार कोणत्याही रुग्णाची व्यक्तीगत माहिती देता येणार नाही, असे केरळच्या आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान चीनहून परतलेल्या आणि कोरोना व्हायरसने बाधीत महिलेची प्रकृती जलदगतीने सुधारत आहे.
कोरोनाबाधीत रुग्ण सापडल्यानंतर केरळ सरकारने व्यापक मोहीम हाती घेतली असून एक हजार 600 जणांना वैद्यकीय देखरेखी खाली ठेवण्यात आले आहे. ही महिला कोचीला येण्यापुर्वी कोलकात्यात चार तास थांबली होती. त्यामुळे प. बंगाल सरकारला सतर्कतेचा संदेश आरोग्य विभागाकडून पाठवण्यात आला आहे.
चीममधून स्थलांतरीत करून आणलेल्या 324 भारतीयांना स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांना तेथे दोन आठवडे वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात येईल. त्यापैकी एक जणात कोरोनाची बाधा झाल्याची लक्षणे दिसत आहेत.