Tamil Nadu Politics: तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळगम’ (TVK) पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी, बहुमताचा आकडा गाठताना त्यांची दमछाक होताना दिसत आहे. अशातच, ‘ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळगम’ (AIADMK) ने विजय यांना पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिल्याने राज्यातील राजकीय पेच वाढला आहे. केपी मुनुसामी यांचे मोठे विधान – AIADMK चे नेते उप-समन्वयक केपी मुनुसामी यांनी बुधवारी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. “परिस्थिती काहीही असली तरी, AIADMK कोणत्याही परिस्थितीत TVK प्रमुख विजय यांना पाठिंबा देणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. या भूमिकेमुळे विजय यांच्यासाठी सत्तेचे समीकरण जुळवणे कठीण झाले आहे. जादूई आकड्यापासून TVK १० जागा दूर – २३४ सदस्य संख्या असलेल्या तमिळनाडू विधानसभेत बहुमतासाठी ११८ जागांची आवश्यकता आहे. TVK चे संख्याबळ १०८ जागा (सर्वात मोठा पक्ष) आहे. विजय यांनी दोन जागांवर विजय मिळवला आहे, त्यापैकी एका जागेचा राजीनामा दिल्यास पक्षाचे संख्याबळ १०७ वर येईल. DMK सोबत निवडणूक लढवलेल्या काँग्रेसच्या ५ आमदारांनी विजय यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, तरीही TVK बहुमताच्या आकड्यापासून ६ ते ७ जागा मागे आहे. राज्यपालांची भूमिका आणि शपथविधीवर टांगती तलवार – विजय यांनी आज राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, अद्याप अधिकृत आकडा स्पष्ट नसल्याने राज्यपाल समाधानी नाहीत. त्यामुळे उद्या होणारा विजय यांचा संभाव्य शपथविधी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. विजय यांचा करिश्मा, पण सत्तेचा मार्ग खडतर – तिरुचिरापल्ली पूर्व आणि पेरम्बूर या दोन्ही जागांवर विजय मिळवून थलपथी विजय यांनी आपला करिश्मा केवळ पडद्यापुरता मर्यादित नाही, हे सिद्ध केले आहे. मात्र, तमिळनाडूच्या राजकारणातील दोन प्रमुख शक्ती (DMK आणि AIADMK) त्यांच्या विरोधात उभ्या ठाकल्याने, पहिल्याच प्रयत्नात मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गाठण्यासाठी त्यांना इतर अपक्ष किंवा छोट्या पक्षांची मनधरणी करावी लागणार आहे.