नारायण डोह, 30 (प्रतिनिधी)- नारायणडोह (ता. नगर) गावात एका शेत वस्तीवर झालेल्या बॉम्बस्फोटात दोघे जखमी झाले आहेत. बुधवारी (दि. 28) सायंकाळी ही घटना घडली. बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर चार किलोमीटर परिसरात त्याचे हादरे जाणवले. सुदैवाने त्या बॉम्बमधील केमिकलचा भडका उडाला नाही. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
याबाबत सविस्तर हकीगत अशी की, नगर तालुक्यातील नारायणडोह येथे गावापासून दूर असलेल्या बाबासाहेब रामराव फुंदे यांच्या वस्तीवर जाण्यासाठी रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला होता. या मुरुमात पीन असणारा जुन्या काळातील बॉम्ब होता. जवळच्या शेतात गवत कापण्यासाठी आलेल्या फुंदे यांच्या पत्नी मंदाबाई यांना तो बॉम्ब गोळा सापडला.
त्या महिलेने सापडलेला बॉम्बगोळा तेथून जवळत शेतात काम करत असलेल्या अक्षय साहेबराव गाडे या तरुणाकडे दिला. त्यानेही केवळ कुतूहलापोटी तो बॉम्बगोळा जमिनीवर आपटला. त्यात त्याचा मोठा स्फोट झाला. यामध्ये अक्षय साहेबराव गाडे व बॉम्ब घेऊन आलेली महिला मंदाबाई फुंदे, असे दोघेही जखमी झाले आहेत. या बॉम्बस्फोटाचा आवाज साधारण चार किलोमीटर अंंतरापर्यंत ऐकू आला.
या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पथकासह भेट दिली. घटनास्थळाची बॉम्ब शोधक पथकानेही पाहणी केली. या गावाच्या परिसरात अजून काही बॉम्ब आहेत का? याची तपासणी बॉम्बशोधक पथकाने केली आहे. मात्र, इतर ठिकाणी बॉम्ब आढळून आलेला नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
भीतीपोटी माहिती लपविली…!
शेतातील रस्त्याच्या कडेला दोन दिवसांपूर्वी बुधवारी (ता. 28) सापडलेला बॉम्ब लोखंडाचा गोळा असावा, अशी शंका आल्याने त्या युवकाने तो जमिनीवर आपटला. मात्र, त्याचा स्फोट होऊन दोघेही जखमी झाले. तातडीने त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, हातून काहीतरी अपराध घडल्याची भावना झाल्याने त्यांनी ही माहितीच पोलिसांपासून लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, याची गावभर चर्चा पसरली. त्यानंतर पोलिसांकडे ही चर्चा पोचल्यावर खरा प्रकार उजेडात आला.