Agriculture News – कधी कडक ऊन, कधी ढगाळ वातावरण तर सकाळी पडणारे दाट धुके अशा हवामानाच्या लहरी स्वभावामुळे आळेफाटा परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. खरीप हंगामात अवकाळी आणि परतीच्या पावसाने कंबरडे मोडल्यानंतर, आता रब्बी हंगामातील पिकांवर ढगाळ वातावरण आणि दवबिंदूंच्या वाढत्या प्रमाणामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सकाळी उशिरापर्यंत राहणाऱ्या धुक्यामुळे कांदा, गहू, हरभरा आणि मका या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील अवकाळीतून सावरत शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली होती. सुरुवातीला पिके जोमात आली, मात्र आता धुक्यामुळे कांदा रोपे, हरभऱ्याच्या कळ्या आणि गव्हाच्या ओंब्यांवर विपरीत परिणाम होत आहे. गव्हावर मावा आणि हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करत आहेत. उत्पादन खर्च वाढत असताना बाजारभाव मिळेल की नाही, या चिंतेने शेतकऱ्याला ग्रासले आहे. विक्रमी कांदा लागवड धोक्यात यंदा मुबलक पाणी आणि बाजारातील दरामुळे मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड झाली आहे. शेतकऱ्यांनी महागडी रोपे घेऊन विक्रमी लागवड केली असून, अजूनही ही प्रक्रिया सुरू आहे. मात्र बदलत्या हवामानामुळे या महागड्या पिकावरही संकटाचे सावट पसरले आहे. जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन हवामानातील बदलाचा परिणाम केवळ पिकांवरच नाही, तर मानवी आरोग्य आणि जनावरांवरही होत आहे. सर्दी-तापाचे प्रमाण वाढले असून जनावरांना सकाळी दव असलेल्या गवतावर न नेण्याचा सल्ला दिला जात आहे. गायी-म्हशींना थंडीपासून वाचवण्यासाठी गोणपाट झाकणे, शेकोटी करणे आणि करडांसाठी उबदार बल्ब लावण्याचे मार्गदर्शन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. बळीराजा चिंतेत खरीपपासून रब्बीपर्यंत यंदाचे हवामान शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरले आहे. जोमात आलेल्या पिकांकडे पाहून आशा वाटत असली, तरी आभाळातील बदलत्या छटा पाहून शेतकरी धास्तावला आहे. हाता तोंडाशी आलेला घास वाचवण्यासाठी बळीराजाला निसर्गाशी मोठी झुंज द्यावी लागत आहे.