Modi Government : सर्जिकल स्ट्राईकनंतर मोदी सरकारचे आता डिजिटल स्ट्राईक ! 59 हजारांपेक्षा जास्त WhatsApp अकाऊंट केले ब्लॉक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या I4C या संस्थेने सायबर गुन्हे रोखण्यात मोठे यश मिळवले आहे. 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत या संस्थेने 1,700 पेक्षा जास्त स्काईप खाती आणि 59,000 पेक्षा जास्त WhatsApp खाती ब्लॉक केली आहेत. ब्लॉक करण्यात आलेली खाती ही फसवणुकीच्या गुन्ह्यात वापरली जात होती.
का करण्यात आली कारवाई?
सायबर गुन्ह्यांपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी लोकसभेत ही माहिती दिली. याशिवाय 2021 मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘सिटिझन फायनान्शियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग अँड मॅनेजमेंट सिस्टम’च्या मदतीने 9.94 लाखांहून अधिक तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून 3431 कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान टाळण्यात आले आहे.
बावनकुळे, पडळकर यांच्यासह 6 आमदारांचे विधानपरिषदेचं सदस्यत्व रद्द; नेमकं काय आहे कारण ?
सायबर फ्रॉड मिटिगेशन सेंटर तयार केले
सायबर गुन्हे रोखण्यासाठी सरकारने सायबर फ्रॉड मिटिगेशन सेंटर (CFMC) हे नवीन केंद्र तयार केले आहे. या केंद्रात बँका, वित्तीय कंपन्या, दूरसंचार कंपन्या, आयटी कंपन्या आणि पोलीस एकत्र काम करतील. अशा प्रकारे सर्व संघटना एकत्रितपणे सायबर गुन्ह्यांचा तपास करू शकतात.
सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी बनवले खास सॉफ्टवेअर
डिजिटल फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांना सामोरे जाण्यासाठी एक मजबूत यंत्रणा विकसित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, केंद्र सरकार आणि दूरसंचार सेवा पुरवठादारांनी (टीएसपी) इनकमिंग आंतरराष्ट्रीय बनावट कॉल ओळखण्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केले आहे.
या नवीन तंत्रज्ञानामुळे असे नंबर ब्लॉक केले जाऊ शकतात आणि भारतीय मोबाईल नंबर दाखवणारे आंतरराष्ट्रीय कॉल्स रोखले जाऊ शकतात.यामुळे मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे रोखले जाऊ शकतात.





