२ हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर अर्थराज्यमंत्री म्हणाले,”हातगाडीवाल्यापासून उद्योजकांपर्यंत…”

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मोठा निर्णय घेत २ हजार रुपयांच्या नोटा वितरणातून काढून घेण्याच्या निर्णयाची घोषणा केली. तसेच ३० सप्टेंबरपर्यंत नागरिकांनी या २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा कराव्यात, असे निर्देश दिले. यानंतर या निर्णयाची जोरदार चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारमधील केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी प्रतिक्रिया दिली.
भागवत कराड म्हणाले, “रिझर्व्ह बँकेकडून एका निर्णयाची घोषणा करण्यात आली. यानुसार चलनातील २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यास सांगण्यात आलं आहे. त्यासाठी ३० सप्टेंबर ही शेवटची तारीख दिली आहे. म्हणजे नोटा बदलून घेण्यासाठी ६ महिन्याचा वेळ आहे.”
“आरबीआय ही स्वायत्त संस्था असल्याने त्यांनी जनतेला आवाहन केलं आहे की, आपल्याकडे असणाऱ्या २ हजार रुपयांच्या सर्व नोटा बँकेत जमा करा. एकावेळी २० हजार रुपयांच्या नोटा जमा करता येतील. आरबीआय स्वायत्त संस्था असल्याने असे निर्णय अनेकदा घेते,” असे मत भागवत कराड यांनी व्यक्त केले.
या निर्णयानंतर मागीलप्रमाणे सर्वसामान्यांचे हाल होणार का? यावर भागवत कराड म्हणाले, “यावेळी तसं काही पहायला मिळणार नाही. कारण पुरेसा ६ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. याशिवाय आता हातगाडीवाल्यापासून उद्योजकांपर्यंत प्रत्येकाला डिजीटल व्यवहार माहिती झाले आहेत. त्यामुळे बँकेतील व्यवहार डिजीटल माध्यमातून होत आहे.”
“सर्वांना डिजीटल व्यवहार माहिती आहेत, ते हे व्यवहार शिकले आहेत. बाकी ज्यांना बँकेत जाऊन पैसे जमा करायचे आहेत ते कोणत्याही बँकेत जाऊन पैसे जमा करू शकतात,” असेही कराड यांनी नमूद म्हटले आहे.





