मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता चांगलाच चिघळला असल्याचे पाहायला मिळत आहे. कर्नाटकात महाराष्ट्रातील ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची घटना घडल्यानंतर त्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटले. दरम्यान याच घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपली भूमिका कायम असल्याचे सांगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर फोनवर चर्चा झाल्याचीही माहिती बोम्मई यांनी ट्वीटरवरुन दिली.
मुख्यमंत्री शिंदेंबरोबर फोनवर चर्चा झाल्याची माहिती बोम्मई यांनी ट्वीटरवरुन दिली आहे. यासंबंधी केलेल्या ट्विटमध्ये “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर मी फोनवर चर्चा केली. आमच्या दोघांचंही एकमत झालं आहे की दोन्ही राज्यांमध्ये शांतता, कायदा सुव्यवस्था कायम रहावी,” असे बोम्मई यांनी म्हटले आहे.
दोन्ही राज्यांमध्ये शांतता नांदावी यासंदर्भात दोन्ही नेत्यांचं एकमत झाल्याचं सांगतानाच बोम्मई यांनी कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयामध्येच कायदेशीर लढाई लढू असा इशारा देत आपली भूमिका ठाम असल्याचे म्हटले आहे.
दुसऱ्या ट्विटमध्ये बोम्मई यांनी, “दोन्ही राज्यांमधील लोकांचे एकमेकांशी चांगले संबंध आहे. मात्र असं असलं तरी कर्नाटक सीमाप्रश्नाबद्दल आमची भूमिका जैसे थे आहे. सर्वोच्च न्यायालयामध्येच कायदेशीर लढाई होईल,” असेही स्पष्ट केले आहे.