आळंदी – गुरूवारी (दि. 1)जून रोजी खेड तालुक्यातील काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. आळंदीमध्ये वडगाव रस्त्यावरील झाडे पडली. तसेच अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. दरम्यान, चऱ्होली खुर्द हद्दीतील पद्मावती रस्त्यावरील पाझर तलाव येथे असलेल्या ठाकर वस्ती परिसरात आदीवासी ठाकर कुटुंबियांना या वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे.
वादळी वाऱ्यामुळे ठाकर कुटुंबियांचे घरावील छप्पर उडून गेले, पावसाने घरातील सर्व साहित्य भिजले. शांताबाई ठाकर यांचा संसार उघड्यावर आला आहे. या दुर्घटनेत काहींना दुखापतही झाली आहे. त्यातील एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. रेखा ठाकर आणि हिराबाई ठाकर अशी जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत. हिराबाई यांच्यावर कुरे रुग्णालयात उपचार करण्यात आले तर रेखा ठाकर यांच्यावर कमलेश रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
दरम्यान, परिसरातील विष्णू कुऱ्हाडे, भागवत काटकर, अर्जुन मेदनकर, मंडूबाबा पालवे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे यांसह आदी नागरिकांनी ठाकर कुटुंबियांची भेट घेतली असून शासन स्तरावर दुर्घटनाबाधित कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी पाठवुरावा केला जात आहे.