दावोसच्या 54 सामंजस्य करारांपैकी 43 तर भारतातल्याच कंपन्या, तर मग…; आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई – दावोस मधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या भारताच्या पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला राहिला. यामुळे महाराष्ट्राला जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यासमवेत विक्रमी १५ लाख ७५ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार करता आले. यातून राज्यात १५ लाख ९८ हजार रोजगार निर्मिती होईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच दावोस मध्ये गुंतवणूकीचे ५४ आणि धोरणात्मक सहकार्याचे ७ असे एकूण ६१ सामजंस्य करार केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर युवसेना प्रमुख व ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ५४ सामंजस्य करार करण्यात आले. यातील ४3 कंपन्या भारतातल्याच आहेत, तर ११ विदेशी कंपन्या आहेत. एवढ्या कंपन्या भारतातल्या आहेत तर मग मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम का नाही घेतला? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच बर्फाचे कपडे घालून फोटो काढण्यापेक्षा सह्याद्री किंवा मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम घेऊन पैसा कमी खर्च झाला असता, असा टोला देखील आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावाला आणि त्यांचे लाडके मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत होते. त्यांच्या विभागाचे करार मुख्यमंत्र्यांनी केले. नगरविकास विभागाचे अधिकारी दावोसला आणि मंत्री गावाला, त्यांना निमंत्रण होते की नाही? त्यांना सोबत का नेले नाही? ती नाराजी आता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला.
आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, एसआरए आणि रस्त्याच्या कॉंट्रॅक्टला सुद्धा पुढच्या वेळेस दावोसला घेऊन जातील असे कळते आहे. टेंडर काढून काम द्या काही ठिकाणी तुम्ही थेट करार करताय. प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांच्या आधी उद्योग मंत्री पोहोचायला हेवत. पण ते मुख्यमंत्र्यांच्या नंतर गेले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होते म्हणून उशीरा निघाले का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.
उद्योग मंत्री यांचा असा काय कार्यक्रम होता जे तिथे थांबू शकत नव्हते? पक्षांतर्गत नाराजी होती का? मुख्यमंत्री सगळे काम सोडून तिथे थांबत होते, मात्र उद्योगमंत्री का थांबू शकत नाहीत? असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच गेल्या दोन वर्षात मॅग्नेटिक महाराष्ट्राचा कार्यक्रम झालेला नाही. मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम घेणे गरजेचे आहे असे ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला आहे. ते म्हणाले, सल्ला देण्याइतका मी एवढा मोठा नाही. पण इतर राज्यातील मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात जाऊन मॅग्नेटिक महाराष्ट्र सारखा कार्यक्रम घेतात तो घ्यावा. संपूर्ण चार दिवस करार करण्यामध्ये घालण्यात अर्थ नव्हता. जगभरातले नेते, विविध देशातील उद्योगपती यांच्या भेटीसाठी घेण्यास सुद्धा गरजेच्या आहेत. तो प्रयत्न मी केला होता. मात्र, यावेळी असा कुठलाही प्रयत्न झाला नाही. कोणत्याही भेटी घेतल्या नाहीत. तसेच काही गुंतवणूक चांगल्या झाल्या याचा आनंद आहे. पण काही ठिकाणी गुंतवणूक झाल्यासारखे दाखवून फसवले जात आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच का..?
दावोसमध्ये करार झालेले अनेक उद्योग भारतीयच आहेत तर दावोसमध्येच करार का अशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात येत आहेत. याबाबत राज्य सरकारकडून माहिती देण्यात आली आहे, त्यानुसार, दावोसमध्ये जगभरातील सीईओ येतात. आपल्या कित्येक कंपन्या भारतीय असल्या तरी त्या आता वैश्विक झाल्या आहेत. या कंपन्यांचे विदेशी गुंतवणूकदार- भागिदारांशीही यानिमित्ताने चर्चा करण्यात आली. दावोस हे आंतरराष्ट्रीय नेटवर्कींगचे केंद्र आहे. भारतीय कंपन्यांना करार करताना त्यांचे विदेशी गुंतवणुकदार सोबत असावेत असे वाटणे गैर नाही. महाराष्ट्रात गुंतवणूक होणारी ९५ टक्के गुंतवणूक विदेशी आहे. कराराचे रूपांतर प्रत्यक्षात आणण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. आतापर्यंत देशाचा आणि महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रात सुमारे ६५ ते सत्तर टक्के कराराचे रूपांतर प्रत्यक्ष गुंतवणूक येण्यात झाली आहे. यावेळी सर्वच करार फलद्रुप करण्यावर आमचा भर आहे.




