वाघोली (प्रतिनिधी) – वाघोली गावासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. वाघोलीतील नागरिकांचे नागरीप्रश्न सोडविण्याची जबाबदारी महानगर पालिकेवर असून महानगरपालिका अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यावर वाघोलीसाठी निधी नसल्याचे उत्तर मिळत आहे. लोकहितासाठी लोकशाही पद्धतीने सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन केले करण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
काही महिन्यांपूर्वीच वाघोलीगाव पुणे महानगर पालिकेत समाविष्ट झाले असून वाघोलीमधील रहिवाशी संख्या जवळपास दोन लाखांच्या घरात आहे. तसेच दररोज उद्योग, व्यवसाय व नोकरी निमित्त येणाऱ्या लोकांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
सध्याची वाघोलीची परिस्थिती पाहता अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, कचरा, वीज यांसारख्या मुलभूत सुविधांपासून नागरिक वंचित राहत आहेत. अनेक ठिकाणी ड्रेनेज अभावी दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वाघोली गाव महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केल्यामुळे मुलभूत समस्या सोडवण्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेचीच असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
वाघोलीतील नागरीप्रश्न सोडविण्याची जबाबदारी महानगर पालिकेवर आहे. महानगरपालिकेका अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यास आमच्याकडे वाघोलीसाठी निधी नाही असे सातत्याने उत्तर मिळते. वाघोलीचा महानगर पालिकेत समावेश केल्यानंतर देखील नागरिक उस्त्फुर्तपणे कर भरीत आहेत. नागरिकांकडून कर जमा केला जातो. परंतु मुलभूत सुविधा देण्यासाठी मात्र महानगरपालिकेकडून उदासीनता दाखवली जात आहे.
नागरी समस्या व देखभाल (मेंटेनन्स) करणेकामी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा लोकहितासाठी लोकशाही पद्धतीने सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी अॅड. गणेश म्हस्के, (उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, विधी विभाग), संकेत जाधवराव (उपाध्यक्ष हवेली तालुका मनसे) सुनील विटकर, प्रकाश जमधडे, हितेश बोऱ्हाडे, मंगेश सातव, गणेश तापकिर, कृष्णा मोहिते आदी उपस्थित होते.