Sanjay Raut : अपघात टाळता येत नाहीत? मग यांना काय टाळता येतं? संजय राऊतांचा अहमदाबाद विमान दुर्घटनेवर केंद्रावर हल्लाबोल

Sanjay Raut : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या फ्लाइटला झालेल्या भीषण अपघाताने देशभर हळहळ व्यक्त होत आहे. लंडनला निघालेले हे विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेकंदांत मेघानीनगर परिसरातील मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळले.
या दुर्घटनेत २४१ प्रवासी, क्रू मेंबर्स आणि वसतीगृहातील २४ डॉक्टर व मेडिकल विद्यार्थ्यांसह एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला. यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. या घटनेने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असताना, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका करत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली.
राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सरकारच्या बेपर्वा वृत्तीवर बोट ठेवले. “२४१ प्रवाशांचा मृत्यू, २४ डॉक्टर आणि विद्यार्थ्यांचा बळी, राखरांगोळी झालेली परिस्थिती, पण सरकारच्या चेहऱ्यावर दुखाची रेषा, वेदना किंवा पश्चात्ताप दिसत नाही,” असे सणसणीत टीकास्त्र सोडत त्यांनी सरकारला धारेवर धरले. “रेल्वे अपघात, पहलगामसारखे दहशतवादी हल्ले, आणि आता हा विमान अपघात जर सरकारला हे सगळं टाळता येत नसेल, तर मग यांना नक्की काय टाळता येतं?” असा थेट सवाल राऊतांनी उपस्थित केला.
राऊत यांनी एअर इंडियाच्या खासगीकरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “एअर इंडियाचं खासगीकरण करून टाटांना देण्यात आलं, पण एक कोटी रुपये देऊन प्रश्न सुटत नाहीत. ड्रीमलाइनरसारखे अत्यंत सुरक्षित समजले जाणारे विमान उड्डाणानंतर अवघ्या ३० सेकंदांत कोसळते, दोन्ही इंजिने बंद पडतात. पक्ष्याची धडक की तांत्रिक बिघाड, याची सखोल चौकशी व्हायला हवी,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच, ड्रीमलाइनर खरेदीवेळी भाजपनेच गैरव्यवहार आणि दबावाचे आरोप केले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.
“३० सेकंदांत विमान कोसळते, याचा अर्थ तांत्रिक तपासणीत कुठेतरी चूक झाली. याची जबाबदारी कोण घेणार? यात महाराष्ट्रातील १०-१२ जणांचाही बळी गेला आहे. ब्लॅक बॉक्सच्या चौकशीतून सत्य समोर येईल, पण सरकारने आता निष्क्रिय राहून चालणार नाही,” असे राऊत म्हणाले. या अपघाताने भारतीय हवाई क्षेत्राच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे सांगत त्यांनी राजकारणापेक्षा सखोल तपास आणि जबाबदारी निश्चितीवर भर दिला.





