Kolhapur Accident – राज्यात काही दिवसांपासून सातत्याने अपघाताचे सत्र सुरू असून कोल्हापुरातही भीषण दुर्घटना घडली आहे. हा अपघात कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर घडला आहे. ऊस वाहतूक करणा-या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सैन्य २ तरूणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पारस परीट (वय २१) आणि सुरेश उंड्रीकर (वय २१) अशी मृत युवकांची नावे आहेत. दोघेही अंबर्डे शाहूवाडी येथील रहिवासी आहेत. हे दोघेही सैन्य भरतीसाठी गेले होते. तेथून गावी परत येत असताना कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील भाडळी खिंड हद्दीत हा भीषण अपघात घडला. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील भाडळे खिंड येथून ऊस वाहतूक करणारा ट्रक जात होता. त्याच वेळी हे तरूणही गावी परतत होते. यावेळी भरधाव ट्रकने त्यांचा वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत तरूणांच्या डोक्याला जबर मार बसला. दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक परशुराम शिरसाठ, पोलीस हेडकॉन्स्टेबल कोगेकर, चालक माळी आणि महामार्ग पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब पालखी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.