– हिमांशू
“क्रौर्य’ या शब्दाची व्याख्या नेमकी काय आहे? “छळ’ या शब्दाच्या सीमारेषा काय आहेत? या संज्ञा शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर लागू पडत असल्यामुळे बऱ्याच जणांचं बऱ्याच ठिकाणी कन्फ्यूजन होऊ शकतं. अशा वेळी व्याख्या करण्याचं काम न्यायालयाकडे सोपवलं जातं आणि दोन्ही पक्षांना न्यायालयाचा निर्णय मान्य करावा लागतो.
सामान्यतः वैवाहिक जीवनातील संघर्षाच्या वेळी या संज्ञांची चीरफाड दोन्ही बाजूंचे वकील अहमहमिकेनं करतात. एखाद्या पतीने पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिला त्यावरून वारंवार डिवचल्याच्या घटना वारंवार घडतात; पण पत्नीनेच पतीच्या चारित्र्याचा संशय घेऊन वारंवार डिवचण्याची घटना मात्र दुर्मिळ मानली जाते. त्यामुळे क्रौर्य, छळ या संज्ञाही बहुतांश प्रकरणांत पतीलाच लागू पडतात.
पत्नीने पतीचा छळ केला किंवा त्याच्याशी क्रूर व्यवहार केला, असं सहसा घडत नाही. मग काही ठिकाणी या संज्ञा “वाकवून’ वापरल्या जातात आणि सामान्य वर्तनही क्रूरता ठरते. छत्तीसगड उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या प्रकरणात नेमकं हेच घडलं. पती रोज रात्री उशिरा घरी येत असेल आणि त्यावरून पत्नीने त्याच्या चारित्र्यावर संशय घेतला, तर त्याला क्रूरपणा म्हणायचं का? असा प्रश्न या खटल्यात उभा राहिला. परंतु अशा वातावरणात पत्नीने पतीवर संशय घेणंही क्रूरता नसून ते एक “परिस्थितीजन्य सामान्य मानवी वर्तन’ आहे, असा निवाडा उच्च न्यायालयाने दिला.
परिस्थिती अशी होती की, पती रोज रात्री उशिरा घरी येत असे. कधीकधी तो रात्री घरीच येत नसे. परंतु यावरून आपल्या चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीने आपल्याशी क्रूर व्यवहार केला, असं पतीचं म्हणणं होतं. कौटुंबिक न्यायालयात त्याने त्यासाठी घटस्फोटाची परवानगी मागितली होती आणि त्याच्या याचिकेला न्यायालयाने परवानगीही दिली होती.
त्याला पत्नीने उच्च न्यायालयात आव्हान दिलं. पतीचं म्हणणं असं होतं की, मी “राजकीय कार्यकर्ता’ आहे आणि त्याच कामामुळे मला घरी परतायला उशीर होतो. नेतेमंडळींना दिवसा वेळ नसल्यामुळे कार्यकर्त्यांशी त्यांची रात्री उशिरापर्यंत खलबतं चालतात, हे खरंय. किंबहुना काही राजकीय खलबतं रात्रीच करावीत, असा अलिखित नियमसुद्धा राजकारणात आहे.
पण ते वेगळं! तूर्तास हे वर्तन “अस्पष्ट आणि असामान्य’ ठरतं की नाही, एवढाच प्रश्न आहे. अशा वेळी जर पत्नीने पतीच्या चारित्र्याविषयी संशय घेतला तर ते “सामान्य मानवी वर्तन’ ठरावं की ती “क्रूरता’ मानली जावी, असा अजब तिढा या प्रकरणात निर्माण झाला होता. कौटुंबिक न्यायालयाने पतीची बाजू उचलून धरली; मात्र उच्च न्यायालयात पत्नी जिंकली. हे प्रकरण तितकंसं महत्त्वाचं नसलं तरी बऱ्याच जणांच्या बाबतीत हे घडतं म्हणून त्याचं महत्त्व वाढतं.
शिवाय, याच्या अगदी उलट परिस्थिती असती तर काय घडलं असतं, असाही विचार करायला हवा. पत्नी रोज रात्री उशिरा घरी परतली असती, तर पती कसा वागला असता? राजकीय कामामुळे पत्नी उशिरा येते, हे त्याला पटलं असतं का? पती-पत्नीपैकी कुणीही कुणावर शंका घेणं चुकीचंच आहे; पण शंकेला जागा निर्माण होतेय का, हेही तपासायला हवंच ना?