Abhay Deol: अभय देओल म्हणाले, ‘स्वतःला सांभाळणं कठीण, मग मूल कशाला?’

Abhay Deol: बॉलिवूड अभिनेता अभय देओल नेहमी आपल्या स्पष्ट मतांसाठी चर्चेत राहतो. अलीकडेच त्यांनी एका पॉडकास्टदरम्यान लग्न आणि मुलं या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अभय म्हणाले की, त्यांना स्वतःचं मूल नको आहे.
अभय देओल यांनी सांगितलं, “जर मला घर बसवायचं असेल तर मी मूल जन्माला घालण्याऐवजी दत्तक घेणं पसंत करेन. कारण मी जगाकडे पाहतो आणि विचार करतो की या आधीच वाढलेल्या लोकसंख्येमध्ये अजून भर का घालावी? या पृथ्वीवर आधीच खूप बोझ आहे. त्यात अजून वाढ करू नये, म्हणून मला मूल नको आहे.”
त्यांनी पुढे सांगितलं की, “मला माहीत नाही मी कसा पिता ठरेन. मी स्वतःच्या भावनांना किती सांभाळू शकेन? कदाचित मी खूपच कंट्रोल करणारा किंवा अधिकार गाजवणारा बाप होऊ शकतो. आज मी जितका शांत आणि स्वतंत्र आहे, तेवढा राहणार नाही. सतत ताण घेणारा, जास्त सुरक्षात्मक होऊ शकतो. म्हणूनच मला वाटतं की मूल न घेणंच योग्य आहे.”
अभय यांनी मान्य केलं की त्यांच्यात काळजी घेण्याची भावना कुटुंबातून आली आहे. पण, “स्वतःला सांभाळणं जसं कठीण आहे, तसं मूल वाढवणं माझ्यासाठी खूप अवघड होईल,” असं ते म्हणाले.
कामाबद्दल बोलायचं झालं तर अभय देओल नुकतेच या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बन टिक्की’ या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत शबाना आझमी आणि नुसरत भरुचा प्रमुख भूमिकेत झळकल्या होत्या.





